मतदार संख्येमध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता असल्याने मतदारयादी अंतिम झाल्यावर पुन्हा आरक्षण सोडत घ्यावी- राष्ट्रीय काँग्रेस
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - फलटण शहर व तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला गेला होता, त्या संदर्भात निवडणूक शाखे कडून कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. तसेच मतदार यादी सदोष असल्या कारणाने त्यावर अनेक हरकती दाखल झालेल्या आहेत. त्यावरून काही प्रभागातील मतदार संख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, म्हणजेच काही प्रवर्गातील मतदार संख्येमध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे, मतदार संख्या निश्चित न होताच, आधीच जाहीर झालेल्या आरक्षणावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फलटण नगर परिषद निवडणुकीसाठीची मतदारयादी अंतिम झाल्यानंतरच पुन्हा आरक्षण सोडत घेण्यात यावी अशी मागणी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री.महेंद्र सुर्यवंशी (बेडके) व शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री पंकज पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी श्री निखिल जाधव यांच्याकडे केली. याप्रसंगी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री गंगाराम रणदिवे व काँग्रेसचे पदाधिकारी पदाधिकारी श्री. धनंजय गोरे,श्री.सुधीर शिंदे उपस्थित होते.
No comments