Breaking News

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन समारंभ – ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ ९.१५ वाजता

72nd Anniversary of Indian Republic Day Ceremony - Main Government Ceremony of Flag Hoisting at 9.15 am

    मुंबई  :- दिनांक 26 जानेवारी, 2022 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 09.15 वाजता आयोजित करण्यात यावा. हा समारंभ आयोजित करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे. या मुख्य शासकीय समारंभात मर्यादित निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी 8.30 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

    जिल्हास्तरावरील कार्यक्रम साजरा करण्याच्या दृष्टीने प्रथेनुसार पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत : विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. तसेच राष्ट्रध्वजारोहण करणारे मा.मंत्री / राज्यमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर पोहचू न शकल्यास विभागीय मुख्यालयी, विभागीय आयुक्त यांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे व ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालये येथे ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतीवर किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

    दिनांक २६ जानेवारी, २०२२ रोजी मुंबई व नागपूर येथे शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात यावी.

    राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी.

    राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी १०९१/३०, दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ व क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता)/ ३०, दिनांक ११ मार्च १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पाडावा. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

    राज्यातील उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक लक्षात घेता, शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या दि. ८ जानेवारी, २०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय सभेकरीता निर्धारित केलेल्या संख्येनुसार निमंत्रितांची उपस्थिती ठेवण्यात यावी.

    उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग /कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.

    स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोनायोद्धा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही मर्यादित नागरिकांनाच निमंत्रित करावे.

    कोरोनाविषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता, प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर (Social Distancing) संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल, याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल. आयोजकांनी त्यानुसार मान्यवरांना निमंत्रित करण्याची कार्यवाही करावी. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

    सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी संकेतस्थळाद्वारे थेट प्रक्षेपण करावे.

    दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे :- वृक्षारोपण, आंतर शालेय / आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा/ देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात येऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये, महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, सोशल मीडियाद्वारे निवडक विद्यार्थी/ विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे/ भाषणे आयोजित करावे, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी. एखाद्या विषयाचा वेबीनार आयोजित करावा, एन.एस.एस. व एन.वाय.के.एस द्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मीडिया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा/ संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

    विभागीय आयुक्त कोकण विभाग, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती येथे समारंभ करण्याबाबत योग्य ती व्यवस्था सर्व संबंधितांच्या सल्लामसलतीने करावी. विभागीय आयुक्त, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती हे त्यांच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाकरिता योग्य ती व्यवस्था करणार असल्यामुळे जिल्हाधिकारी पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती येथे या संबंधी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही.

    मा. राज्यपाल हे सकाळी मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमामध्ये विविध विभागातर्फे लोकाभिमुख योजनांच्या अनुषंगाने सादर करण्यात येणारे चित्ररथ व पोलीस महासंचालक यांचेकडून दरवर्षी सादर होणारे ध्वजसंचलन यावर्षी रद्द करण्यात यावेत.

    संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. त्यांच्या अधिकार क्षेत्रात त्या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून सर्व बाबी योग्य तऱ्हेने कार्यान्वित होतील याबाबत त्यांनी व्यक्तीशः दक्षता घ्यावी.

    काही ठराविक जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता अंमलात असल्यास सर्व संबंधितांना यासंदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात :

    अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये. (ब) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करू नये. (क) पालकमंत्री यांच्या भाषणाचा आशय केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व यापुरताच मर्यादित असावा आणि त्यांनी कोणतेही राजकीय स्वरूपाचे भाषण करु नये. बलिदान केलेल्या हुतात्मांच्या तसेच देशाचा गौरव यापुरतीच भाषणे मर्यादित असावीत.

No comments