Breaking News

ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

Start your service centers in Gram Panchayats - District Collector Santosh Patil

    सातारा दि. 1 : सातारा जिल्ह्यात एकूण एक हजार पाचशे ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एकोणसाठ ग्रामपंचायतींमध्येच आपले सेवा केंद्र सुरु आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये लवकरात लवकर आपले सेवा केंद्र सुरु करुन नागरिकांना गावातच विविध दाखले उपलब्ध करुन द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी विविध विभागांच्या विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीला पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे दूरदृष्य प्रणालीद्वारे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात उपस्थित होते.

    ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढाचे अद्याप राहिले आहेत अशा शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कृषी विभागाने तात्काळ काढावेत, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणी साठ्याचे आत्तापासूनच नियोजन करा. यामध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. धरणांमधील पाणी कमी झाल्याने धरणांमधील गाळ काढण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.

    जनगणनेच्या कामाबाबत बोलताना जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी स्पष्ट केले की, घरोघरी जाऊन केली जाणारी घरांची गणना अत्यंत अचूक आणि निश्चित केलेल्या मुदतीतच पूर्ण झाली पाहिजे. सर्व पर्यवेक्षकांनी  प्रत्यक्ष जागेवर जाऊन या सर्व बाबींची काटेकोरपणे पडताळणी करावी. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे, अशा राहिलेल्या सर्व व्यक्तींचे मॅपिंग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. मतदार मॅपिंगचा वेग आणि टक्का वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. या दोन्ही कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा.

    सेवा हमी कायद्यांतर्गत प्रत्येक विभागाने आपली सेवा वेळेत देण्याबाबत खरबदारी घ्यावी. कार्यालय हे सौर उर्जेवर आणण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 14 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने कार्यवाही करावी तसेच जनसुविधा व नागरि सुविधांच्या कामांना गती द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.

No comments