शुक्रवारी मनोजदादा जरांगे पाटील फलटण दौऱ्यावर - मराठा क्रांती मोर्चा फलटण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ ऑगस्ट २०२५ - दि. २९ ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजाच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे शुक्रवार दि.8 ऑगस्ट रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, यावेळी संपूर्ण सातारा जिल्ह्यासह आसपासच्या पुणे,सांगली,सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधव येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घ्यावी असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटण व अखंड मराठा समाज राजधानी सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आरक्षणासंदर्भात तसेच विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी व गेली अनेक दिवस उपोषण करूनही राज्य सरकारने लेखी व तोंडी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला आहे, व या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अखंड मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यासाठी व पश्चिम महाराष्ट्रातील अखंड मराठा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी फलटण येथे शुक्रवार दिनांक 8/8/2025 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने करण्यात आली असून, या वेळी फलटण तालुक्यातील मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे व कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाण्यासाठी तयार रहावे असे आवाहन केले आहे.
No comments