Breaking News

कास पठार येथे ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण

कास पठार येथे ई-बस व बायोटॉयलेट  सुविधेचा लोकार्पण सोहळा इनसेटमध्ये ऑनलाईन उदघाटण करताना पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा 

Inauguration of e-bus and biotoilet facility at Kas Plateau

    मुंबई,दि.२२: सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी आज राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ - ई बसेसचे तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे,स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी  आराखडा तयार करणे,सुरक्षा वाढविणे तसेच,घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

      मंत्रालयातून मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते दूरचित्रप्रणालीव्दारे,ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला.या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री श्री.लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार श्रीमंत छत्रपती  उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती   शिवेंद्रसिंहराजे भोसले, सरपंच यांचे आभार मानले. कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

          याप्रसंगी अपर मुख्य सचिव नितीन करीर,पर्यटन संचालक मिलींद बोरीकर,सहसंचालक धनंजय सावळकर उपस्थित होते तर दूरदृश्यप्रणालीव्दारे सातारा येथून आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

          मंत्री श्री. लोढा म्हणाले, पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेले कास पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिक रित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चीत वाव देण्यात येईल.

            यावेळी आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कास पठारावरील प्रदुषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. कास पठारावरील प्रदुषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाची वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना आणखीन सुविधा तसेच नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करावी, यासाठी नेहमीच सहकार्य राहील,अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

           कास पठारावरील फुले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. येथील प्रदुषण कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई-बस सेवा सुरु करण्यात येत आहे. ह्या ई-बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळकडून उपलब्ध झालेल्या आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षीपासून आणखीन ई-बसेसचे नियोजन केले जाईल. तसेच कास संवर्धनासाठी आणखीन उपाययोजना  केले जातील, असे जिल्हाधिकारी श्री.जयवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

 निसर्गरम्य कास पठार

        सहयाद्री पर्वतराजीत सातारा शहरापासून २५ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य असे कास पठार आहे. या पठारावर सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात रंगांचा बहर जवळपास १० चौरस कि.मी. मध्ये पाहायला मिळतो. ८५० वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी पहायला मिळते व त्यामुळे विविध प्रकारच्या फुलपाखरु देखील बगडतात. जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुलांच्या रोपांचे चक्र वाढत असल्याने पठार दर १५-२० दिवसांनी रंग बदलत असल्याचे दिसते. वनस्पती विज्ञानासाठी अजूनही नवीन असलेल्या अनेक जाती पठारावर आढळतात तसेच अनेक स्थानिक व लुप्त होत चालेल्या वनस्पती सुद्धा इथे आढळून येतात. कास पठार हे वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासात भविष्यातील संशोधनासाठी  उपयोगी ठरेल. गेल्या 4-5 वर्षात हे स्थळ पर्यटकांना आकर्षित करत आहे. कास पठाराला हंगामात दररोज तीन हजार पेक्षा जास्त पर्यटक भेट देतात.

          युनिस्कोने देखील कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणास मान्यता दिली आहे.हे स्थळ राखीव वन व जैवविविधतेचे भंडार असले तरी येथील नैसर्गिक वनसंपत्तीचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटन विभाग पर्यावरण पुरक पर्यटन संकल्पने अंतर्गत या ठिकाणी या हंगामा करिता ४ ई- बसेस सुरु करण्यात येत आहेत. बसेस कासनी गावापासून कास पठारापर्यंत अर्धा कि.मी. पर्यंत चालविण्यात येतील. यामुळे या परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणास आळा बसण्यास मदत होईल.

         पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर सौदर्याने अतिशय बहरलेला दिसतो. या परिसरात ठोसेघरचा धबधबा, बामनोली येथे कोयनेचा जलाशय, वासोटा किल्ला, सज्जनगड किल्ला, अशी विविध पर्यटन स्थळे आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून बामनोली येथे नवीन जल क्रीडा केंद्र उभारण्यासाठी ४५ कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आला आहे. एकंदरीत या संपूर्ण परिसरास एक एकात्मिक टुरिझम सर्कीट विकसीत करण्यात येईल आणि त्यातुन या भागातल्या स्थानिक युवकांना रोजगार मिळेल तसेच आर्थिक विकासाला चालना दिली जाईल. आगामी काळात अशा अन्य पर्यटन स्थळां ठिकाणी सुद्धा ई-बसेस सुरु करता येतील. त्या माध्यामातुन पर्यटन विकासाबरोबर पर्यावरण रक्षणाला ही प्राधान्य देण्यात येईल.

No comments