कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या 51 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ
सातारा (जिमाका) : जिल्ह्यामध्ये कोविड-19 मुळे दोन पालक गमावलेल्या 10 बालकांना व एक पालक गमावलेल्या 41 बालकांना अशा एकूण 51 बालकांना बाल कल्याण समिती, सातारा यांच्यामार्फत् बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या यादीतील 2395 विधवांपैकी 422 महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संजय गांधी निराधार योजना, श्रावणा बाळ योजना, इंदीरा गांधी विधवा योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इ. योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती सदस्य सचिव कृती दल तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. एस. ढवळे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कृती दल समितीच्या बैठकीवेळी दिली.
कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या 12 बालकांना ज्या शाळेत दाखल केले आहे त्यापैकी 11 बालकांची शैक्षणिक फी त्या शाळांनी व महाविद्यालयांनी माफ केली आहे. उर्वरित दोन पालक व एक पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक फी माफीबाबत व सामाजिक संस्थेची मतद घेऊन शैक्षणिक फी भरण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती श्रीमती ढवळे यांनी यावेळी दिली.
या बैठकीस कृती दलातील सर्व सदस्य उपस्थित होते.

No comments