स्वामी विवेकानंद नगरचा कायापालट; 92 गुंठ्यांत उभे राहणार भव्य गार्डन - आ. सचिन पाटील
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० -: स्वामी विवेकानंद नगर परिसरातील हॉटेल रायगड शेजारी गेल्या 30 ते 40 वर्षांपासून मोठा खड्डा असून तेथे घाणीचे साम्राज्य माजले होते. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता तसेच रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली होती. या समस्येबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन पाहणी केली होती. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून या जागेच्या विकासाची मागणी केली होती.
या मागणीला प्रतिसाद देत स्वामी विवेकानंद नगरमधील सुमारे 92 गुंठे जागेत सुसज्ज उद्यान उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या उद्यानात विविध प्रकारची वृक्षलागवड, नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, बसण्यासाठी बेंचेस आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच वन विभागाच्या परवानगीने येथे ओपन जिम उभारण्याचाही मानस असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले.
या उद्यानामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच नागरिकांना विरंगुळा, व्यायाम आणि स्वच्छ वातावरणाची सुविधा मिळणार असून फलटणच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
स्थळपाहणी प्रसंगी आमदार सचिन पाटील यांच्यासमवेत वन विभागाच्या बोटकर मॅडम, युवा नेते अभिजीत भैया नाईक-निंबाळकर, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाइस चेअरमन रणजितसिंह भोसले, नगरसेवक राहुल भैया निंबाळकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments