भारतीय डाक, पुणे शहर पश्चिम डाक विभागाचा वार्षिक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
पुणे शहर पश्चिम डाक विभागाचा वार्षिक पुरस्कार सोहळा २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील भूविज्ञान सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
पुणे टपाल क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल सुश्री प्रीती अग्रवाल आणि पुणे विभागाचे टपाल सेवा संचालक श्री. अभिजीत बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कु. अनघा भूमकर यांच्या भरतनाट्यम सादरीकरणाने झाली. पुणे शहर पश्चिम डाक विभागाचे अधीक्षक श्री. नितीन येवला यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि गेल्या वर्षभरातील पुणे शहर पश्चिम विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला.
२०२५-२०२६ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला. व्यवसाय वाढ, पीएलआय/आरपीएलआय, पोस्ट ऑफिस बचत बँक, टपाल कामकाज आणि ग्राहक सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि महिला बचत एजंटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे शहर पश्चिम विभागात कार्यरत असलेल्यां खेळाडूंनाही त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे टपाल क्षेत्राचे संचालक श्री. अभिजीत बनसोडे यांनी विभागीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्यात सात प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे शहर पश्चिम विभागाचे अभिनंदन केले. त्यांनी स्पीड पोस्ट व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही केले. पुणे शहर पश्चिम विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यापेक्षाही आणखी चांगली कामगिरी करू शकतात आणि त्यांनी ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात, पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल सुश्री प्रीती अग्रवाल यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या विभागाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. त्यांनी आर्थिक समावेशन आणि पार्सल वाहतुकीविषयी मौल्यवान माहिती दिली. त्यांनी सोप्या उदाहरणांद्वारे पोस्टमनच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले आणि सर्व टपाल कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी त्यांनी नमूद केले की, महिला प्रधान बचत एजंट टपाल विभागात सामील होऊन आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी महिला प्रधान बचत एजंट्सच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे म्हटले. त्यांनी भारतीय टपाल विभागाची पार्सल लॉजिस्टिक्स प्रणाली भविष्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचेही वर्णन केले. त्यांनी यावरही भर दिला की, जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करण्याचा आणि त्यांच्या विकासात योगदान देण्याचा टपाल सेवा हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे, त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याचे आवाहन केले. शेवटी, त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांचे चांगले कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले.
श्री. सिद्धार्थ हरळे यांनी आभार व्यक्त केले आणि भारतीय राष्ट्रगीताच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments