श्री स्वामी समर्थ मंदिर हलवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा - दादासाहेब चोरमले व निलेश तेलखडे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २८ फेब्रुवारी २०२६ - फलटण शहरातील गिरवी नाका परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान ठरलेले "श्री. स्वामी समर्थ" मंदिराबाबत नगरपरिषदेने पुन्हा एकदा स्थलांतराचा प्रस्ताव मांडल्याचे समजते श्री. स्वामी समर्थ मंदिर हे फलटण शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराला आता पुन्हा दुसऱ्यांदा धक्का लावाल तर याद राखा असा गंभीर इशारा शिवसेनेचे नेते दादासाहेब चोरमले व फलटण शहर शिवसेनाप्रमुख निलेश तेलखडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये चोरमले व तेलखडे म्हणतात की, विशेष म्हणजे यापूर्वीही नगरपरिषदेने हे मंदिर हलवले होते. आता वाहतुकीला कोणताही अडथळा नसताना पुन्हा स्थलांतराचा निर्णय का घेतला जात आहे, हे समजण्यास आम्ही दूधखुळे नसून आता मात्र मंदिराला कोणत्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. काही वर्षांपूर्वी रस्ते रुंदीकरणाच्या कारणास्तव मंदिराचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाने वाहतुकीची समस्या आणि सुरक्षेचा मुद्दा पुढे केला होता. मात्र सध्या संबंधित ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू असून कोणताही अडथळा नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नगरपरिषदेमध्ये नव्याने काही निवडून गेलेल्या अति शहाण्या नगरसेवकांनी मंदिर पुन्हा हलवण्याचा प्रस्ताव चर्चेला आणला होता.
दरम्यान, परिसरातील रहिवासी आणि भक्तांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. “मंदिर आधीच एकदा हलवले आहे. पुन्हा हलवणे म्हणजे धार्मिक भावना दुखावण्यासारखे आहे,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. जर मंदिर हलवण्याचा प्रयत्न कराल तर मंदिर बचाव समितीच्या माध्यमातून खूप मोठा संघर्ष उभा केला जाईल याची जाणीव नगरपरिषद प्रशासनाने ठेवावी काही झाले तरी मंदिराला धक्का लावून दिला जाणार नसल्याचेही शेवटी त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

No comments