प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास सक्त मनाई - जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा, दि. १४ (जि. मा. का.) : राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये, यासाठी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तरी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केलेली आहे. याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व आस्थापनांनी आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी जनतेने देखील आवश्यक काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

No comments