Breaking News

मानवी जीवनामध्ये संवादाची फार आवश्यकता - शांताराम आवटे

Communication is very necessary in human life - Shantaram Awate

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१ जुलै २०२३ -   मानवी जीवनामध्ये संवादाची फार आवश्यकता आहे. संवाद नसेल तर त्यातून विसंवाद निर्माण होतो, हा विसंवाद टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, तरच जीवन सुखकर होईल. मानवी जीवनात संस्कार हे टप्प्याटप्प्याने होत असतात, हे संस्कार दीर्घकाळ टिकण्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार केले पाहिजेत, त्यासाठी घरामध्ये संवादाची फार आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात संवाद हा दुरावत चाललेला आहे, त्यामुळे खरं बोलणारावर वैचारिक हल्ला होतो असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटणचे माजी अध्यक्ष, माजी प्राचार्य  शांताराम आवटे यांनी व्यक्त केले.

    नाना नानी पार्क फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला 29 वा  साहित्यिक संवाद कार्यक्रमात माजी प्राचार्य शांताराम आवटे बोलत होते.  यावेळी माजी प्राचार्य रवींद्र येवले, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, माणदेशी साहित्यिक व संयोजक ताराचंद्र आवळे, प्रा. सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    शांताराम आवटे पुढे म्हणाले की जीवन जगताना माणसाने समन्वयाने मार्ग काढला पाहिजे कणाकणाने आयुष्य वाढले पाहिजे त्यासाठी राग, द्वेष,तिरस्कार, अहंकार याचा त्याग केला पाहिजे तसेच जीवन हसत हसत जगले पाहिजे.

    प्राचार्य रवींद्र येवले यांनी कारगिल युद्धाची आठवण करून देऊन, त्यावेळी लढलेल्या शूर जवानांच्याप्रती सद्भावना व्यक्त केल्या. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूची आपण जाण ठेवली पाहिजे व त्यांच्याप्रती आपण नेहमीच सकारात्मक असले पाहिजे.

    पमाजी प्राचार्य सुधीर इंगळे म्हणाले की, सातारा जिल्ह्यामध्ये जे शहीद जवान झाले, त्यांच्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत, त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे व  त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देऊन लढण्याचे बळ दिले पाहिजे.

    माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे म्हणाले की, आजची सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहता मन सुन्न होते. माणूस फक्त धावत आहे, तो सुखाचा विचार करत नाही, सुख म्हणजे घरातल्या सुखवस्तु हीच त्याची कल्पना झालेली आहे, त्यामुळे त्याच्या जीवनातला जगण्याचा आधारच कमी होत चालला आहे, त्यामुळे संवादाची अधिकाधिक गरज असून, माणसांनी एकत्र आले पाहिजे व व्यक्त झाले पाहिजे.

    यावेळी हरिराम पवार, अविनाश चव्हाण, प्रा.अशोक शिंदे, जयदीप भगत, नियत वनक्षेत्राधिकारी  अश्विनी शिंदे, अक्षय मखरे, करिष्मा मुलाणी यांनी चर्चेत सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले तसेच श्रावणात घन निळा बरसला या आशयाच्या  कविता सादर करून संवादामध्ये रंगतदारपणा आणला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी केले तर आभार श्रेयश कांबळे यांनी मानले. यावेळी सुरेश भगत, श्रीनिवास लोंढे, सचिन भांडवलकर, नितीन मदने तसेच फलटण तालुक्यातील लेखक, कवी,  साहित्यप्रेमी, वाचक, उपस्थित होते.

No comments