पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आ.सचिन पाटील आदेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ जून २०२५ - श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२५ चे आगमन लक्षात घेता, आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील फलटण तालुक्यातील अपूर्ण कामांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आज तहसील कार्यालय, फलटण येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत पालखीच्या आगमनापूर्वी महामार्गावरील सर्व अपूर्ण व अर्धवट कामे त्वरित पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.
बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी सौ. प्रियांकाआंबेकर , प्रियोजन निर्देशक संजय कदम (NHAI), तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नायब तहसीलदार अभिजीत सोनावणे, गटविकास अधिकारी श्री. कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. आंबेकर, पोलीस प्रशासन, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कृषी विभाग, जलजीवन मिशन व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गावरील खड्डे, अर्धवट सिमेंट रस्ते, अपूर्ण गटारी व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. अधिकारी वर्गाला योग्य वेळेत कामे पूर्ण करून सोहळ्याच्या वेळेस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
पालखी मार्ग हा संतपरंपरेचा सन्मान आणि लाखो वारकऱ्यांचा श्रद्धेचा मार्ग असल्यामुळे, या मार्गावरील कोणतीही कुचराई सहन केली जाणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
No comments