निरा देवघरची रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील ; रामराजे यांच्यामुळेच प्रकल्प रखडला - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - निरा देवघर प्रकल्पाच्या अर्धवट राहिलेल्या कामांना आता गती मिळणार आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येऊन, त्याचा लाभ फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांना होणार आहे. नीरा देवघर प्रकल्पाच्या रखडलेल्या कामांना एआयबीपीची मान्यता मिळाली असल्याचे सांगतानाच, निरा देवघर प्रकल्पाच्या रखडलेल्या कामास तत्कालीन मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हे जबाबदार असून, त्यांनी स्वतःचे मंत्रिपद वाचवण्यासाठी प्रकल्पातील कामे अर्धवट ठेवली व पाणी बारामती कडे वळवले असल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर निंबाळकर यांनी केला
फलटण येथे विश्रामगृहात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कृष्णा खोर्याचे मंत्री असताना रामराजे यांनी निरा देवघर धरण हे शंभर टक्के भरत नसल्यामुळे त्याचे पुढील कालवे रद्द केले, 65 किलोमीटरच्या पुढे एक रुपयाही या प्रकल्पास मंजूर केला नाही आणि ते पाणी ठराव करून बारामतीला वळवले, हे संपूर्ण षडयंत्र आज पंतप्रधान कार्यालयाकडून मोडले गेले आहे. महाराष्ट्राने निरा देवघर प्रकल्पाची एआयबीपीची मान्यता गमावली होती, ती मान्यता पुन्हा मिळवण्यात यश आल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
निरा देवघर धरण झाल्यानंतर, राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता आली, सत्ता बदल झाल्यानंतर प्रकल्पाचे कॅनॉल पूर्ण करायचे नाहीत असे शरद पवार व अजित पवार यांनी रामराजे यांना सांगितले, पाण्याची उपलब्धता जास्त नाही, साईट चुकीचे आहे असा रिपोर्ट एआयबीपीला दिला गेला, हे सर्व या खात्याचे मंत्री रामराजे यांनी ठरवले असते तर, हे सर्व थांबवून, निरा देवघरचे पाणी माळशिरसच्या टोकापर्यंत नेता आले असते, परंतु रामराजे यांनी तसं न करता, पाणी बारामतीला वळवले, निरा देवघर धरण शंभर टक्के भरत नसल्याचा बनावट अहवाल समिती पुढे ठेवल्याने, सदर प्रकल्पाची कामे रखडली गेली, परंतु आता निरा देवघर धरणाचा हायड्रोलॉजी सर्वे केला असता, त्यामध्ये धरण क्षमतेपेक्षा जास्त भरत असल्याचे दिसून आले तसा अहवाल समितीने सादर केला असून, यामुळे आता निरादेवघर प्रकल्पातील रखडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
खोटे अहवाल तयार करण्यामध्ये जे अधिकारी, मंत्री व आमदार सहभागी होते त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी करणार असल्याचेही खासदार रणजीत सिंह यांनी सांगितले.
No comments