संकलीत करापोटी वसूल झालेले ६ कोटी रुपये शहरातील मूलभूत सुविधांसाठी वापरावे - अशोकराव जाधव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ फेब्रुवारी - फलटण शहरातील मूलभूत गरजांचे तीन-तेरा वाजलेल्या आहेत, मात्र नगरपालिका निधी नाही म्हणून, मूलभूत सुविधा पुरवित नाही, वास्तविक श्रीराम सहकारी साखर कारखान्या कडून थकीत करापोटी ६ कोटी रुपये नगरपालिकेकडे जमा झाले असून, सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मर्जीने हा फंड राखून ठेवला आहे, या निधीतून शहरातील विविध कामे मार्गी लागू शकतात, पण मुख्याधिकारी हा निधी वापरत नसल्याचा आरोप अशोकराव जाधव यांनी करून, हा निधी रस्ते, साईड गटार, खड्डे, आरोग्य समस्या, कचऱ्याचे व्यवस्थापन व भुयारी गटार मुळे खराब झालेल्या मलटण व फलटण मधील रस्त्याचे डांबरीकरण या साठी प्रामुख्याने ६ कोटी रुपयांचा निधी वापरावा अशी मागणी केली आहे.
शहरातील मूलभूत सुविधांसाठी पैसा नाही म्हणणारी नगरपालिका हे ६ कोटी रुपये, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जमिनीचा मोबदला देण्यासाठी वापरणार आहे अशी शंका येत आहे. या जमा झालेल्या पैशातून पालखी रोड दुरुस्ती, पिण्याचे पाण्याची व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, हे ६ कोटी रुपये मूलभूत सोयी सुविधांसाठी वापरले गेले नाही तर, आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार आहोत, यासाठी फलटणकर जनतेने जागृत राहून पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे एका पत्रकाद्वारे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी आवाहन करून त्या बाबतचे निवेदन ही मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दिले आहे.
No comments