पाचट न जाळणाऱ्या शेतकऱ्यांचा होणार गौरव ; पर्यावरण संवर्धन शेती मित्र प्रमाणपत्राने होणार सम्मान
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - पर्यावरणाचा ऱ्हास मानवाच्या मुळावर येऊ लागला आहे. बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन अनेक संकटांना निमंत्रण देत आहे. मनुष्य प्राण्याने हव्यासापोटी पर्यावरणाचे अतोनात नुकसान केलेले आहे. अधिकाधिक अन्न उत्पादन करण्याच्या नादात जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. रसायन विरहीत पारंपारीक शेतीतून तयार होणारे अन्नच भावी पिढीचे रक्षण करू शकते. पर्यावरण संवर्धन हे व्रत एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजरित्या हस्तांतरीत झाले पाहिजे. मुळात 'अन्न हेच औषध' ही आपली भारतीयांची मुळ संकल्पना आहे हे विसरून चालणार नाही. या ज्वलंत प्रश्नावर विधायक दृष्टीकोनातून काम करणाऱ्या मानदेश विकास फाऊंडेशन माण, सातारा व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने एक विधायक उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या व मंडळाच्या वतीने ऊसाची पाचट न जाळणाऱ्या शेतकऱ्यांना पर्यावरण संवर्धन शेती मित्र प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष उध्दव बाबर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांनी दिली.
उध्दव बाबर व लिंबाजी भड यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माणदेश विकास फाऊंडेशन माण,सातारा ही संस्था पर्यावरण रक्षणासाठी व संवर्धनासाठी काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऊसाची पाचट न जाळणाऱ्या शेतकऱ्यांना गौरवण्याचा निर्णय संस्थेने व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, या निमित्ताने या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खोडवा ऊसाचा पाला न जाळता, एक आडसरीमध्ये तसाच ठेवावा किंवा पाचट कुट्टी करावी. त्यामुळे त्याचे मोठे फायदे आहेत. त्यामुळे हेक्टरी एक ते दीड कोटी लिटर पाण्याचे व सुमारे शंभर ते दिडशे युनिट विजेची बचत होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
पाचटाच्या आच्छादनामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात व श्रमात ५० टक्क्याची बचत होत असल्याची उध्दव बाबर यांनी सांगितले व शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे पाण्याच्या पाळ्यातील आंतर वाढते. तरी ऊसाची वाढ चांगली होते. तसेच ऊस क्षेत्रातून एकरी पाच ते सहा टन पाचट मिळते. त्यापासून दोन ते तीन टन सेंद्रिय खत कोणतीही वाहतुक न करता विना खर्चात खोडवा पिकाला शेतातच मिळते.
ऊसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टनाची वाढ होते. पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठ भागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्नद्रव्ये उदा. नत्र ४० ते ५० किलो, स्फुरद २० ते ३० किलो, पाला ७५ ते १०० किलो, ऊसाला उपलब्ध होते. जमिनीचे तापमान थंड राखले जाते. त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते. शेतात गांडूळांची नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते तसेच पाचटातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्म सुधारतात व जलधारण शक्ती वाढते. पाचट कुजत असताना त्यातून पिकाला आवश्यक असणारा कार्बनडाय ऑक्साईड वायु बाहेर पडतो त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. रिकाम्या सरीमध्ये हंगामानुसार वाटाणा, वैशाखी मुग, उडीद किंवा चवळी ची पिके घेतल्यास अतिरिक्त उत्पादनाबरोबर जमिनीची सुपिकता सुधारते. पाचट न जाळल्यामुळे महत्वाचे फायदे होत असून पर्यावरण रक्षणाला फार मोठा हातभार लागत आहे.
त्यामुळे माणदेश विकास फाऊंडेशन, माण सातारा च्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप्रादेशिक कार्यालय, सातारा यांच्या वतीने पाचट न जाळणाऱ्या व शेतातच पाचट कुट्टी करून खत निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांना पर्यावरण संवर्धन शेती मित्र प्रमाणपत्र देऊन गौरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतातील पाचट न जाळल्याचे फोटो शेतकऱ्याचे नाव, गाव, पूर्ण पत्ता, फोन नंबर, मोबाईल नंबर शेतकऱ्यांनी संस्थेकडे पाठवावा. संपर्क नंबर उध्दव बायर मोबा. ९८२३०६०५६० ९४२३०६०५६०.
No comments