अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन
(गंधवार्ता वृत्तसेवा) - अनाथांची माय असणार्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना नुकतेच पद्मश्री पुसस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सिंधुताई यांच्यावर महिनाभरापासून उपचार सुरु होते. त्यांच्यावर हर्निया संबंधित शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उपाचाराला प्रतिसाद दिला. मात्र, आज सकाळपासून त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले आणि रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची माहिती सिंधुताई यांचे निकटवर्तीय यांनी दिली आहे.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
सिंधुताईंनी अनेक खडकर प्रसंगाना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत. त्यांना 2012 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली पद्मश्री पुसस्काराने सन्मानिक करण्यात आले होते.
No comments