कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न -जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा (जिमाका): कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील संबंधीत सर्व शासकिय यंत्रणांनी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतीदलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांच्यासह कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.
सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या 17 बालकांची माहिती तसेच एक पालक गमावलेल्या 597 बालकांची अशा एकूण 614 बालकांची माहिती जिल्हा व बाल विकास अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली असून त्यापैकी दोन पालक गमावलेल्या एकूण 17 बालकांचे व एक पालक गमावलेल्या एकूण 522 बालकांचे असे एकूण 539 सामाजिक तपासणी अहवाल करण्यात आलेले आहेत. तसेच कोविड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 15 बालकांना व एक पालक गमावलेल्या एकूण 507 बालकांना अशा एकूण 522 बालकांना बाल कल्याण समिती, सातारा यांच्यामार्फत आदेश प्राप्त करुन बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीतील 2902 विधवा महिला पैकी एकूण 422 महिलांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विधवा महिला व अनाथ बालकांना त्यांचे मालमत्ता विषयक हक्क प्राप्त करुन देण्याबाबतचे निर्देश दिले.
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 15 अनाथ बालकांपैकी 4 बालकांना त्यांचे स्थावर मालमत्ता वारस नोंदी केलेल्या आहेत. तसेच 15 अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र व रक्कम 5 लाख अर्थसहाय्याच्या मुदत ठेव पावतीचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लवकरच वितरीत करणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे यांनी बैठकीत सांगितले.
No comments