लोकमान्य
गंधवार्ता SPECIAL - लोकमान्य टिळक स्मृतीदिन विशेष
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक पत्रकार, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे लोकप्रिय नेते होते. लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला खऱ्या अर्थाने ‘भारतीय’ स्वरूप दिले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अतुलनीय योगदान असून आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण देशासाठी वेचतानाच त्यांनी क्रांतिकारकांची वैचारिक पिढी घडवली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची गर्जना भारतीय स्वातंत्र्य इतिहासात सदैव सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल. 19 व्या शतकात हे बोलणे आणि ते कृतीत आणण्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करण्याचे कार्य फारच कमी लोक करू शकत होते. टिळकांच्या ह्या गर्जनेने भारतीय समाजात चेतना जागृत करण्याचे आणि स्वातंत्र्य चळवळीला जन-चळवळीचे स्वरूप देण्याचे कार्य केले, यामुळे ‘लोकमान्य’ ही उपाधी त्यांना प्राप्त झाली.
लोकमान्य टिळकांनी कामगार वर्गाला राष्ट्रीय चळवळीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. जनतेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची त्यांनी सुरवात केली.
महाविद्यालयातील मित्र महादेव बल्लाळ नामजोशी, गोपाल गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्यासमवेत टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणाशक्ती देणे हा होता.
- अॅड. रोहित अहिवळे, फलटण
No comments