मराठा आरक्षण : १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा

गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 23 सप्टेंबर) - सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा संघटनांकडून, मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली. अनेक ठिकाणी मराठा समाज संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गोलमेज परिषदेमध्ये येत्या 10 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देत इतर 15 ठराव करण्यात आले. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असं सांगण्यात आलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.
मराठा समाज गोलमेज परिषदेतील ठराव खालीलप्रमाणे -
- मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
- मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.
- केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
- महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
- सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी.
- राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.
- मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.
- मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
- स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी.
- अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
- राज्यातील शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
- कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
- राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.
No comments