Breaking News

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध ;धैर्यशील कदमांचा ३०१ मतांनी विजय

The strength of the Mahayuti is proven in the Sangli-Satara Legislative Council; Dhairyasheel Kadam wins by 301 votes

    सातारा दि २२ प्रतिनिधीसांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व कायम राखत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना मोठा विजय मिळवून दिला. कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा तब्बल ३०१ मतांनी पराभव करत विधानपरिषदेत प्रवेश निश्चित केला.
    मतमोजणीअंती धैर्यशील कदम यांना ५९३ मते, तर अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. विजयासाठी आवश्यक असलेला ४४३ मतांचा कोटा कदम यांनी सहज पार करत एकतर्फी विजय नोंदवला. या निकालामुळे पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
    या निवडणुकीत एकूण ८९४ मतदारांपैकी ८८५ मते वैध ठरली, तर ९ मते अवैध घोषित करण्यात आली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच धैर्यशील कदम यांनी मोठी आघाडी घेतल्याने निकालाची दिशा सुरुवातीपासूनच स्पष्ट झाली होती.
    या विजयामागे महायुतीतील प्रमुख नेत्यांनी केलेली प्रभावी रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मजबूत संपर्क आणि मतदारांशी साधलेला संवाद महत्त्वाचा ठरल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजूट दाखवत उमेदवाराच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
    दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाल्याने काही ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, या चर्चांनंतरही महायुतीच्या विजयाच्या फरकावर कोणताही परिणाम झाला नाही.
    निकाल जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयाचा उत्सव साजरा केला. या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मनोबल उंचावले असून, महाविकास आघाडीसाठी मात्र हा निकाल आत्मपरीक्षणाचा विषय मानला जात आहे.
    साताऱ्यात शिवतीर्थावर अभिवादन आणि उदयनराजे यांची भेट
       अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर धैर्यशील कदम यांनी आमदार पदाला गवसणी घातलीच .या विजयामध्ये भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वैयक्तिक लक्ष घातले होते .तसेच भाजपच्या सर्व आमदारांचे सहकाऱ्यांचे आणि मतदारांचे आभार धैर्यशील यांनी मानत सोमवारी सायंकाळी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली .तत्पूर्वी त्यांनी साताऱ्यात आल्यावर शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला .हा विजय माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व मतदारांचा आणि पक्षीय कार्यकर्त्यांचा आहे .पक्षाने ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवले आहेत त्या समन्वयक पद्धतीने पार पाडताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल अशी प्रामाणिक भावना त्यांनी व्यक्त केली .जलमंदिर येथे उदयनराजे यांनी धैर्यशील कदम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शिवप्रतिमा भेट दिली .भाजपने महाराष्ट्रात 17 पैकी 11 जागा पटकावत विधान परिषदेवर आपले वर्चस्व राखले आहे .सातारा जिल्ह्यामध्ये भाजपच्या सर्व धुरंधर नेत्यांचे सामूहिक परिश्रम यशस्वी ठरले हे या निकालाने स्पष्ट झाले.

No comments