आटपाडी ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्चला फलटणकरांचा जाहीर पाठिंबा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ जून २०२५ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने आटपाडी येथून हटवल्याच्या पार्श्वभूमीवर आटपाडी येथील कार्यकर्त्यांनी, याचा निषेध नोंदवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुन्हा स्थापित करावा अशी मागणी घेऊन, आटपाडी ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च काढला आहे, दि. ३ जून रोजी हा लॉंग मार्च फलटण येथे आला असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती तसेच भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती व इतर सामाजिक संघटनांनी लॉंग मार्चचे स्वागत करून जाहीर पाठिंबा दिला व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवले.
हा लॉंग मार्च दिनांक ३०मे २०२५रोजी सायंकाळी ५:३० वाजता आटपाडी येथून सुरु झाला असून, लॉंग मार्च म्हसवड - गोंदवले- दहिवडी - फलटण येथे आला आहे. दि.४ जून रोजी सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून लॉंग मार्च जेजुरीच्या दिशेने निघाला. पुढे जेजुरी - पुणे पिंपरी चिंचवड - तळेगाव दाभाडे-सोमाटणे फाटा-लोणावळा - खोपोली - चेंबूर - मुंबई मंत्रालय येथे झालेला अन्याय दूर करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
No comments