माऊलींचा पालखी सोहळा फलटणचा निरोप घेऊन, सोहळा बरड येथे विसावला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ जून २०२५ - संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज २९ जून रोजी फलटण येथील आपला एक दिवसाचा मुक्काम संपवून, सकाळी ६ वाजता बरडच्या दिशेने प्रस्थान केले. पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे स्वागत व आशीर्वाद घेऊन पालखी सोहळ्यास भक्तिमय वातावरणात निरोप दिला.
सकाळचा पहिला विसावा विडणी (ता. फलटण) येथे घेण्यात आला. येथे ग्रामस्थांनी भक्तिभावाने सजवलेल्या रांगोळ्यांनी, फुलांची उधळण करत वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर पालखीने पुढील प्रवास करत पिंपरद येथे थांब घेतला. पिंपरद येथेही वारकऱ्यांसाठी चहा-नाश्ता, औषधोपचार यांसारख्या आवश्यक सेवा गावकऱ्यांच्या वतीने उपलब्ध करण्यात आल्या.
सायंकाळी ६ वाजता पालखी सोहळा बरड (ता. फलटण) येथे पोहचला. सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या बरड येथे मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत करण्यात आले. आजचा मुक्काम संपवून उद्या ३० जून रोजी पालखी नातेपुते कडे प्रस्थान करेल, सातारा जिल्ह्याच्या सीमेवर सातारा प्रशासनाकडून पालखी सोहळ्यास निरोप देण्यात येईल तर सोलापूर प्रशासनाकडून पालखीचे स्वागत करण्यात येईल.
No comments