सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गोवा येथे जन्मोत्सव! फलटण येथून ५० हून अधिकजण कार्यक्रमासाठी रवाना
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. 17 मे २०२५ - सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा 83 वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात 17 ते 19 मे 2025 या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. 23 देशांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संप्रदायांचे संत-महंत, मंदिरांचे विश्वस्त आणि 25 हजारांहून अधिक साधक, भाविक यांचा सहभाग अन् राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री या महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी फलटण येथून ५० हून अधिक हिंदू सहभागी होणार आहेत. हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल, अशी माहिती सनातन सनातन संस्थचेे श्री. हिरालाल तिवारी यांनी दिली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य-स्वरूप ‘सनातन राष्ट्रा’साठी सामूहिक संकल्प केला आहे. एकूणच गो, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणार्या ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा भव्य लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित करणारा ठरेल.
या महोत्सवाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, पतंजली योगपीठाचे संस्थापक प.पू. योगऋषि स्वामी रामदेवजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूरजी महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपादजी नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.
या महोत्सवा’चे ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’ (अर्थ: धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो) हे घोषवाक्य आहे. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘रामराज्य संकल्प जपयज्ञा’द्वारे एक कोटी श्रीरामनामाचा जप करण्यात येणार आहे. देशभरातील सनातन धर्मीय संत, महंत तथा धर्मगुरु यांच्या तेजस्वी वाणीद्वारे सनातन राष्ट्राचे उद्घोष करण्यासाठी संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्षानुवर्षे सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणार्या हिंदूवीरांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ हा जीवनगौरव पुरस्कार, तसेच धर्मासाठी लढणार्या धर्मरक्षकांना ‘सनातन धर्मश्री’ हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे, तसेच सनातन संस्कृती, राष्ट्र, कला, आयुर्वेद, आध्यात्मिक वस्तू यांचे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
No comments