Breaking News

भावनिक बुद्धिमत्तेचं बीज लहानपणातच पेरूया..!!

Let's sow the seeds of emotional intelligence in childhood..!!

    "माणूस एक सामाजिक प्राणी आहे," हे ग्रीक तत्त्वज्ञ अरिस्टॉटलचं वाक्य आपण अनेकदा ऐकलं आहे. पण खरं विचार केला तर हे वाक्य आजच्या काळात अधिक समर्पक वाटतं. कारण माणसाचं खरं अस्तित्व हे समाजातच रुजलेलं असतं. आपलं वागणं, बोलणं, विचार करणं – हे सगळं काही आपण समाजातून शिकतो. आणि या शिकण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता.

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?
भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence – EQ) म्हणजे आपल्या भावना ओळखणं, त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणं, त्यावर नियंत्रण ठेवणं, इतरांच्या भावना समजून घेणं (सहानुभूती) आणि सामाजिक संबंधांमध्ये संयम व समजूत दाखवणं.

    आज तणाव, असुरक्षितता, एकटेपणा, व्यसनाधीनता आणि आत्महत्येचे प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळी भावनिक संयम आणि भावनिक शिक्षण ही केवळ कौशल्यं नाहीत, तर ते जीवन वाचवण्याची शक्ती बनतात.
संशोधन स्पष्टपणे दाखवून देतं की IQ पेक्षा EQ – म्हणजे भावनिक समज – आपल्याला आयुष्यात अधिक यशस्वी, समाधानी आणि सुसंवादक्षम बनवतं. आणि हे बीज लहानपणीच पेरणं सर्वात प्रभावी ठरतं.

EQ लहानपणातच का शिकवावं?
   बालपण म्हणजे मातीसारखं असतं – जसं घडवलं, तसं वळतं. लहान वयातच जर मुलांना त्यांच्या भावना ओळखायला, त्यांना व्यक्त करायला आणि त्यावर संयम ठेवायला शिकवलं, तर ते मोठं होऊन जीवनातील संकटांसमोर कोसळणार नाहीत. ते भावनांचा अनियंत्रित उद्रेक करणार नाहीत, किंवा पूर्ण गप्पही बसणार नाहीत.

    आपण जर ही संवेदनशीलता लहानपणीच रुजवली, तर आपल्याला संवादक्षम, समजूतदार, जबाबदारी स्वीकारणारी आणि आत्मभान असलेली पुढची पिढी मिळेल. ही खरी सामाजिक क्रांती ठरेल — गुन्हेगारी, हिंसा, आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल.

मुलांमध्ये EQ कसं विकसित कराल?
1. भावना ओळखायला शिकवणं
मुलांना त्यांच्या भावना ओळखायला मदत करा.
"तुला राग आला का?" "तुलं दुख: झालं का?" अशा प्रश्नांमधून संवाद सुरू करा.
मी शाळेत समुपदेशक म्हणून "भावनांचा अभिनय" हा खेळ वापरत असे. एक मूल एखादी भावना चेहऱ्यावर दाखवतं आणि बाकी मुले ती ओळखतात. खेळातून शिकणं अधिक प्रभावी ठरतं.

2. भावना योग्य रीतीने व्यक्त करणं
राग येणं नैसर्गिक आहे, पण त्याचा उद्रेक चुकीचा असतो. "मला खूप राग आलाय, मला थोडं शांत बसायचं आहे" असं बोलणं शिकवणं आवश्यक आहे.

3. मोठ्यांचं वर्तन म्हणजे मुलांचं शिक्षण
मुलं आपण जे करतो ते पाहून शिकतात. जर आपण माफी मागतो, समजून घेतो, शांत संवाद करतो, तर तीही तेच शिकतात. हेच 'Observational Learning' आहे.

4. EQ शिकवण्यासाठी उपयुक्त साधनं
▪️भावनांची गोष्ट, चित्र, नाटक यांचा वापर
▪️“माझी आजची भावना” अशा शीर्षकाखाली लिहिण्याचा सराव
▪️श्वासोच्छ्वासाचे सराव (breathing exercises)
▪️सहभोजन, गप्पा, समूह खेळ

एक अनुभव – एक शिकवण
    दुसरीतील एक मुलगी अचानक शांत झाली. नेहमी हसणारी, खेळणारी ती मुलगी संवाद टाळू लागली. मी तिला माझा अनुभव सांगितला – “माझं आणि माझ्या भावाचं एकदा भांडण झालं होतं, आणि मीही बोलणं बंद केलं होतं.”
ती विचारू लागली, “मग तू तुझ्या भावाशी पुन्हा बोललीस का?”
हळूहळू ती उघडली. तिला तिचे वर्गमित्र नाकारत होते आणि त्यामुळे तिने स्वतःला वेगळं केलं होतं. पण त्या संवादातून तिला जाणवलं की – ती एकटी नाही आणि भावना शब्दांत मांडता येतात.

हीच तर खरी भावनिक समज – स्वतःला समजून घेणं आणि इतरांशी मनापासून संवाद साधणं!

भावनिक संयम हे केवळ एक सौम्य कौशल्य नाही, तर ते अत्यावश्यक जीवनकौशल्य आहे. आपण जर ही शिकवण बालपणात रुजवली, तर मुलं उद्या मानसिकदृष्ट्या सक्षम, सुसंवेदनशील, आणि समाजाभिमुख नागरिक बनतील.

शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणी जर भावनिक समजुतीचं बाळकडू दिलं गेलं, तर आपण केवळ बुद्धिमान नव्हे, तर समजूतदार माणूस घडवतोय — आणि त्याहून मोठं योगदान समाजाला कोणतं असू शकतं?

 - क्रांती पाटील, सायकॉलॉजीस्ट, पुणे

No comments