Breaking News

उत्कृष्ट सभापती म्हणून विधी मंडळाच्या इतिहासात श्रीमंत रामराजे यांचा उल्लेख करावा लागेल - खा. शरद पवार

खा. शरद पवार बोलताना व्यासपीठावर मान्यवर

     Shrimant Ramraje has to be mentioned in the history of Legislative Council as an outstanding Speaker - Sharad Pawar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : संसदीय कार्य पद्धतीच्या मर्यादा, सभागृहाची प्रतिष्ठा, सभागृहावर नियंत्रण, सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्या बाजू समजावून घेऊन, जबाबदाऱ्या सांभाळून सभागृह चालविणे फार कठीण काम आहे, पण अत्यंत शांतपणे, संयमाने, विचार पूर्वक निर्णय घेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रदीर्घ काळ केलेले हे काम उत्तम आहे, एक उत्कृष्ट सभापती म्हणून त्यांचा उल्लेख विधी मंडळाच्या इतिहासात करावा लागेल असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काढले.

पुस्तकाचे प्रकाशन करताना खा. शरद पवार व मान्यवर
            अजिंक्य राजा या आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू  उलगडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन खा. शरद पवार यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खा. श्रीनिवास पाटील होते. प्रमुख उपस्थितांमध्ये आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे, श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

    विधी मंडळ चालविताना अत्यंत संयमाने, शांतपणे, विचारपूर्वक आणि सर्वांचे समाधान होईल अशा पद्धतीने सभागृह चालविणे अलीकडच्या काळात अत्यंत कठीण काम, मात्र श्रीमंत रामराजे यांनी ही जबाबदारी अगदी सहजपणे पेलल्याची अनेक उदाहरणे देत एकाद्या विषयावर संघर्ष, मतभेद असतात त्यावेळी सभागृहावर योग्य नियंत्रण ठेवून योग्य निर्णय करणे सोपे काम नाही, मात्र तरीही अनेक प्रश्नात सरकार, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांचा समन्वय करुन सभागृहात महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय करण्याची जबाबदारी श्रीमंत रामराजे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळल्याचे गौरवोद्गार खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

    संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतीच्या पाण्याचा ज्यांनी विचार केला त्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव अग्रभागी असल्याचे नमूद करीत दुष्काळी भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविताना दुष्काळी भागातील लोकांचे पाण्याचे संकट टळले पाहिजे यासाठी अत्यंत धाडसाने महत्वाचे व धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतल्याचे निदर्शनास आणून देत अलीकडच्या काळात पाण्याच्या प्रश्नांसाठी झालेल्या सर्व निर्णयांचे आणि झालेल्या कामाचे १०० टक्के श्रेय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचेच असल्याचे स्पष्ट प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहेत, गुडघा दुखावल्याने त्यांना पुढे जाता आले नाही अन्यथा एक राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू म्हणून ते निश्चित चमकले असते, लॉ कॉलेज मध्ये प्राचार्य आणि प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे उत्तम काम त्यांनी केले आहे, फलटणचे नगराध्यक्ष म्हणून शहर विकास गतिमान करताना शहर वासीयाना पुरेशा नागरी सुविधा देण्यात ते यशस्वी झाले त्याप्रमाणे विधिमंडळ सदस्य, विविध खात्याचे मंत्री, पालक मंत्री म्हणून त्याचे योगदान मोठे आहे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, श्रीराम सहकारी साखर कारखाना, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक या माध्यमातून सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असल्याचे खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

    नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक भाग असल्याचे नमूद करीत छ. शिवराय हे केवळ महाराष्ट्रातच नाही देशाच्या काना कोपऱ्यातील अगदी सामान्य माणसाच्या हृदयात कोरलेले व्यक्तिमत्व असून ते एक अलौकिक व्यक्तिमत्व होते त्या घराण्याच्या इतिहासाचा कौटुंबिक भाग पाहता छ. शिवरायांच्या कठीण काळात त्यांना आधार देणारी व्यक्ती नाईक निंबाळकर घराण्यातील होती, छ. सईबाई महाराज ह्यानी त्यांना आधार दिल्याचे खा. शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

    नाईक निंबाळकर हे मूळचे धारचे परमार, नंतर ते पवार झाले आणि मूळ पुरुष निंबराज व निमजाई देवीच्या नावाने त्यांना निंबाळकर केले, या निंबाळकर यांनी येथे राज्य निर्माण करुन ते लोकाभिमुख चालविल्याचे सांगत सामान्य माणसामध्ये ज्यांचे नाव आजही आदराने घेतले ते श्रीमंत मालोजीराजे सामान्य माणसाच्या जीवनात भारतीय स्वातंत्र्यानंतर काय बदल घडेल हे समजावून सांगण्यात अग्रभागी असल्याचे सांगत स्वातंत्र्यानंतर पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम या दोन महत्वाच्या खात्यांद्वरे महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाद्वारे त्यांनी अत्यंत उत्तम काम करुन स्वातंत्र्याचा लाभ लोकांपर्यंत पोहचविण्यात महत्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर मोठा संघर्षाचा काळ निर्माण झाला त्यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे एकसंधतत्व टिकवून ठेवण्यात मोठे योगदान दिल्याचे खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले.

    त्याकाळी उजवा आणि डावा अशा दोन कालव्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जाई, उजवा कालवा क्षेत्रात काळजी नसे पण डावा कालवा क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता असे मात्र प्रत्यक्षात तत्कालीन नेतृत्वाने - श्रीमंत मालोजीराजे यांनी -  उजवा डावा असा भेदभाव न केल्याने लोकांची चिंता दूर होत राहिली आणि या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने पाण्याबरोबर ऊस शेतीचे तंत्रज्ञान आणि उत्पादित ऊसाच्या गाळपाची सोय श्रीराम, माळेगाव, सोमेश्वर साखर कारखान्यांच्या माध्यमातून करुन दिल्याने फलटण बारामती भागाचे चित्र पालटल्याचे खा. शरद पवार यांनी केले निदर्शनास आणून दिले.

    श्रीमंत मालोजीराजे एक दृष्टे नेतृत्व असल्याने त्यांनी केवळ आपल्या भागाचा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा, सर्वांगीण प्रगतीचा विचार केला त्यातून कोयने सारखा मोठा वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला, मंत्रालयाची भव्य वास्तू, अनेक पूल, रस्ते, धरणे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक असल्याचे सांगताना तीच भूमिका घेऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पाण्याचा प्रश्न सोडविताना संपूर्ण राज्यातील दुष्काळी तालुक्यांचा विचार केल्याचे खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले.

       छ. शिवाजी महाराज, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ही सर्वसामान्याच्या हिताला प्राधान्य देवून काम करणारी व्यक्तिमत्वे असल्याने त्यांना सतत लोकांच्या हृदयात स्थान मिळाल्याचे नमूद करीत श्रीमंत रामराजे यांच्या सारखा अभ्यासू, विनयशील, संयमी, कर्तृत्ववान नेता लाभला हे तुम्हा सर्वांचे भाग्य असल्याचे खा. शरद पवार यांनी स्पष्ट केले.

    पूर्वी लोकाश्रय कमी असे परंतू राजाश्रय मोलाचा असे त्याकाळात निंबराजाच्या रुपाने या भागात उमटलेल्या सोनपावलातून या भागात सर्वांगीण विकास होत राहिला, निंबराजाचे पुढे निंबाळकर झाले त्यापैकी श्रीमंत मालोजीराजे आणि आता श्रीमंत रामराजे यांनी हा भाग संपूर्ण विकसित केल्याचे गौरवोद्गार अध्यक्षीय भाषणात खा. श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

    पाण्याचा प्रश्न सोडविताना, वापरताना काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील प्रामुख्याने पाण्याच्या प्रश्नासाठी भरीव आर्थिक तरतुदी करण्याची गरज असून त्यामध्ये खा. शरद पवार यांच्या सारख्या अनुभव सिद्ध माणसाने लक्ष घातल्याशिवाय आपलेच पाणी मग ते कृष्णेचे असेल, गोदावरीचे असेल ते मिळविताना अडचणी येणार नाहीत, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असे धोरण निश्चित करावे लागेल असे स्पष्ट प्रतिपादन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    विकासाचे राजकारण करण्याचे बाळकडू, संस्कार खा. शरद पवार यांच्या भाषणातून लाभल्याचे सांगत, त्यांची भाषणे सामान्य माणूस कानात जीव आणून ऐकण्यासाठी प्रयत्नशील असतो इतकी ती मार्गदर्शक, उपयुक्त, लोकांच्या हिताचा विचार करणारे मुद्दे त्यामध्ये असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले.
   पाण्याच्या प्रश्नासाठी आयुष्यातील उमेदीची २५/३० वर्षे घालवून यश मिळविल्यानंतर आता बदलते ऋतुचक्र, जागतिक तापमान वाढ, पर्यावरण संतुलन या विषयात लक्ष घालून भविष्यात येणाऱ्या संकटाची सर्वांना जाणीव करुन देत त्यापासून संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये सर्वसामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

No comments