राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ फलटणमध्ये सर्वपक्षीयांच्यावतीने ३ ऑगस्ट रोजी मुकमोर्चा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ ऑगस्ट- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 'महाराष्ट्रातून मारवाडी व गुजराथी निघून गेले तर येथे काय उरेल?' असे वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी टिकेची झोड उठवलेली आहे. याचे पडसाद फलटण मध्येही उमटले आहेत. फलटणमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची फलटण च्या रेस्ट हाऊसला बैठक होऊन, राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी, बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा. क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते प्रांताधिकारी कार्यालय, फलटण असा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.
फलटण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, आझाद समाज पार्टी, आर पी आय, वंचित बहुजन समाज पार्टी, दलित पँथर इ. सर्व पक्षांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निषेधाचे पत्र देण्यात येणार आहे आणि राज्यपालांची महाराष्ट्रातून उचल बांगडी करावी यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
सर्व पक्षांच्या वतीने फलटण शहर व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की, ३ ऑगस्ट रोजी मोर्चामध्ये सहभागी व्हावे. या मीटिंगच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशोकराव जाधव, मेहबूबभाई मेटकरी, रियाजभाई, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महेंद्र(बबलुभैया) सूर्यवंशी (बेडके), पंकज पवार, सिद्धार्थ दैठणकर, अमीरभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिष(आप्पा) काकडे, शिवसेनेचे प्रदीप झणझणे, आझाद समाज पार्टीच्या वतीने सनी काकडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
No comments