Breaking News

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

Arrival of Saint Shri Dnyaneshwar Mauli's Palkhi in a devotional atmosphere in the district

     सातारा  : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज   टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले.  फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि  हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.

   संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह अन्य  मान्यवर व वरिष्ठ अधिकारी यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले.

     नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी  तसेच लाखो भाविकांनी  दर्शन घेतले. माऊलीच्या  दर्शनासाठी भाविकांनी  एकच गर्दी केली होती.  

राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या जीवनात उष:काल यावा - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

    गेल्या दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या संकटामुळे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नाही. कोरोनाचे संकट काही प्रमाणात दूर झाले आहे. यामुळे यावर्षी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. पालखी सोहळ्यामध्ये उत्साह दिसत असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले असून जिल्ह्यात सहा दिवसांचा मुक्काम आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधांसह इतर सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडूदे व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात उष:काल यावा, अशी प्रार्थना यावेळी केली.

प्रशासनाने पुरविल्या वारकऱ्यांना विविध सुविधा

   आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पाडेगांवमध्ये आगमन झाले. या पालखी सोहळ्यासोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून, गॅस, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असून वारकऱ्यांसाठी   मोबाईल टॉयलेटही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याचबरोबर पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

No comments