शेती पंपाला दिवसा १० तास वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा रस्ता रोको
जिंती नाका, फलटण येथे रस्ता रोको दरम्यान घोषणा देताना आंदोलनकर्ते |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : शेती पंपासाठी दिवसा १० तास अखंडीत वीज पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना फलटण शाखेच्या माध्यमातून जिंती नाका, फलटण येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यामध्ये स्वाभिमानेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी सहभागी झाले होते.
शेती पंपासाठी सध्या आठवड्याचे ३ दिवस दिवसा आणि ३ दिवस रात्री वीज पुरवठा केला जातो, तोही पुरेसा नसल्याने विहीरीत किंवा उपसा सिंचन योजनांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही वीजेअभावी उभी पिके जळून जाताना पहावे लागत असल्याने शेतकरी धास्तावला असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी सांगितले.
मोठ्या मेहनतीने व कष्टाने शेती पिकविताना शेतमालाला रास्त दर नाही, खते, बी - बियाणे, कीटक नाशकांचे दर सतत वाढत आहेत, मजूर मिळत नाही मिळाला तर प्रचंड रोजगार द्यावा लागत असल्याने शेती व्यवसाय सतत आतबट्टयाचा होत असताना वीजेच्या सततच्या लपंडावामुळे उभी पिके पाण्याअभावी जळून जाण्याचा धोका वाढत असल्याचे स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
आजच्या आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, युवक आघाडी तालुकाध्यक्ष प्रमोद गाडे, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर, पक्ष उपाध्यक्ष शकील मणेर आणि निकेल नाळे, शशिकांत नाळे, बाळासाहेब खानविलकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान स्वाभिमानाच्या १० पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन रस्ता खुला केला, ताब्यात घेतलेल्या आंदोलन कर्त्यांना पोलीस ठाण्यात नेवून व्यक्तिगत जामीनावर मुक्त करण्यात आले.
No comments