रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा सुरू ठेवणार मात्र प्रेशराईज केलं तर आत्महत्या करेन - दिगंबर आगवणे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ मार्च - मी केलेल्या मागण्यांपैकी वन विभागाकडून मुरूम उत्खननाबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि पोलीस प्रशासनाकडून आज दोन गुन्हे दाखल होणार होते, परंतु ते दाखल झालेले नसल्यामुळे, आज उपोषण सोडण्याचा घेतलेला निर्णय मला जाणीवपूर्वक बदलावा लागत आहे. आता प्रशासन मला न्याय देईल असे वाटत नाही, त्यामुळे निश्चितपणाने मी उपोषण चालू ठेवतोय, आणि जर मला कोणी प्रेशराईज केलं आणि चुकीच्या पद्धतीने ट्रीट करण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेन आणि याची सर्वस्वी जबाबदारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व प्रशासन यांची राहील असे दिगंबर आगवणे यांनी सांगितले.
दिगंबर आगवणे २३ मार्च पासून फलटण प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणास बसलेले आहेत. उपोषणस्थळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगवणे बोलत होते.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्हा दाखल करण्याचे पत्र देऊनही, अद्याप गुन्हा दाखल होत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. आज उपोषण सुरू करून चार दिवस झाले तरी देखील प्रशासनाकडून अद्याप गुन्हा दाखल होत नाही. २३ मार्च पासून मी उपोषणाला बसलो आहे, दोन दिवसापूर्वी माझ्या कंपनीवर अनधिकृतपणे काही लोक गेले होते, परंतु प्रशासनाकडून त्यावरही कोणतीच कारवाई केली जात नाही, आता प्रशासनाकडून मला न्याय मिळेल अशी परिस्थिती राहिली नाही, त्यामुळे मी माझी लढाई रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे दिगंबर आगवणे यांनी जाहीर केले.

No comments