न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यामुळे सत्ताधार्यांना सणसणीत चपराक - अनुप शहा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ जानेवारी - सत्ताधारी व मुख्याधिकारी यांनी तत्कालीन लिपिक विष्णू केंजळे यांच्या माध्यमातून सन २०१२ साली, शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता, सत्र न्यायालयाने या केसमध्ये सर्व बाजू तपासून, दहा वर्षाच्या संघर्षानंतर माझी निर्दोष मुक्तता केली आहे. मला या खटल्यातून निर्दोष मुक्त केल्यामुळे सत्ताधार्यांना सणसणीत चपराक बसली असल्याचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी सांगितले.
फलटण येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अनुप शहा बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काशीद, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष उषा राऊत, किसान मोर्चा अध्यक्ष नितीन वाघ, फलटण तालुका अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष रियाज इनामदार, शहराध्यक्ष बबलू मोमीन, फलटण शहर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष निलेश चिंचकर, बांधकाम व्यवसायीक सागर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिनांक ६/१०/ २०१२ रोजी तत्कालीन भांडारपाल विष्णू केंजळे यांना,टी ५ दिवे खरेदी प्रकरणी फाईलची मागणी केली असता, ती नंतर देतो, असे केंजळे यांनी सांगितले, त्यामुळे चिडून जाऊन अनुप शहा यांनी, श्री केंजळे, आस्थापना निरीक्षक संतोष फरांदे यांना शिवीगाळ करून हात उगारण्याची तक्रार विष्णू केंजळे यांनी फलटण पोलीस स्टेशनला सत्ताधाऱ्यांनी टाकलेल्या राजकीय दबावापोटी दाखल केली होती, याप्रकरणी अनुप शहा यांच्या वतीने ऍड. जवाहर पोरे यांनी न्यायालयासमोर, अनुप शहा यांनी टी५ दिवे खरेदी प्रकरण भ्रष्टाचार झाला असल्याची फिर्याद जिल्हाधिकारी यांच्याकडे, तत्कालीन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या विरोधात केली होती, म्हणूनच केंजळे यांच्यावर दबाव आणून, हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी खोटी तक्रार दाखल करण्यात आली होती, असा बचाव ऍड जवाहर पोरे यांनी न्यायालयामध्ये अनुप शहा यांच्या वतीने मांडला, तसेच तीन साक्षीदार तपासून या प्रकरणात असलेल्या त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या व केलेला युक्तिवाद व तपासातील त्रुटी व साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने याप्रकरणी माझी निर्दोष मुक्तता केली असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना पत्रकारांचे आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन होत असते, तालुक्यातील पत्रकरांना एक आगळी वेगळी अशी परंपरा आहे. आणि जपण्याचे कामकाज हे तालुक्यातील पत्रकार करीत असल्याचे सांगून, पत्रकार दिनाच्या व संक्रांतीच्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जेष्ठ पत्रकार चंद्रकांत काळे यांनी सूत्रसंचलन केले तर बांधकाम व्यावसायिक सागर शहा यांनी आभार मानले.
No comments