तथागत गौतम बुद्धांच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद - उपमुख्यमंत्री अजित पवार
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई :- तथागत गौतम बुद्धांनी मानवाला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांनी दिलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच मानवजातीचं, अखिल विश्वाचं कल्याण सामावलं आहे. गौतम बुद्धांचे विचार मानवाचं जीवन कायम प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी कार्य केलं. अखिल मानवजातीला त्यांनी अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. आज जगावर कोरोनासारख्या महामारीचं संकट असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी जागतिक मदतीचं, विश्वशांतीचं, सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
No comments