कृष्णा भीमा स्थिरीकरण- फलटण पंढरपूर रेल्वे - नीरा देवघर प्रश्नी खा.रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
![]() |
| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी प्रसंगी छायाचित्र भेट देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर |
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - मतदार संघातील विविध प्रश्नाच्या संदर्भात, माढा मतदार संघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर उपस्थित होत्या. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माढा मतदारसंघातील कृष्णा -भीमा स्थिरीकरण, फलटण - पंढरपूर रेल्वे, नीरा देवधर प्रकल्प, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना, ( जिहे कटापूर) माढा मतदारसंघातील तरुण , बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने मोठा प्रकल्प येण्याबाबत चर्चा केली.
कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेत पंतप्रधानांनी लक्ष घालावे
कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कर्नाटक ला न जाता ते अडवल्यास, सिंचनाच्या व पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल व दरवर्षी येणारी पूरग्रस्त परिस्थिती सुद्धा यामुळे निर्माण होणार नाही. १२ वर्षा पुर्वी ही योजना तयार करण्यात आलेली आहे .परंतु प्रत्यक्षामध्ये ही योजना 2023 मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होती. ही योजना पूर्ण झाल्यास, ११० टी एम सी पाणी महाराष्ट्राला जादा मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण खटाव फलटण या दुष्काळी भागा बरोबर सोलापूर ,पंढरपूर, माळशिरस ,सांगोला करमाळा माढा , अक्कलकोट, मंगळवेढा, या शहरांना पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली निघेल. महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले
कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजना पूर्ण होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जनता व कर्नाटक सरकार हे दोन्ही अनुकूल आहेत, परंतु हा प्रकल्प मोठा असल्या कारणाने, सध्याचे सरकार हे खूप गांभीर्याने घेत नाही, आपण यामध्ये लक्ष घालून, या प्रकल्पास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास, या मतदारसंघातील जनता आपली ऋणी राहील असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
राज्य सरकारमुळे फलटण - पंढरपूर रेल्वे रखडली आहे
ब्रिटिश काळापासून फलटण - पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे, याबाबत ब्रिटिशांनी रेल्वेचे सर्वेक्षणाचे काम सुद्धा पूर्ण केले आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध देवस्थान आहे, त्या देवस्थानाकडे लाखो श्रद्धाळू भाविक दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेसाठी येत असतात. फलटण पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण झालेले आहे . पुढील फलटण ते पंढरपूर रेल्वेचे काम पूर्ण झाल्यास तीर्थ क्षेत्राबरोबरच या भागाचा आर्थिक विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तसेच बेरोजगारांचा प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी मार्गी लागेल. या कामाच्या बाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून २०१८ या वर्षामध्ये १०८ किलोमीटर रेल्वे लाईनच्या संदर्भामध्ये राज्य शासन 50 टक्के वाटा उचलण्यास तयार आहे, अशा आशयाचे पत्र रेल्वे मंत्री यांना देण्यात आले होते. परंतु राज्यामध्ये सत्ताबदल झाला आणि ही योजना रखडली. सध्याचे शासन ही योजना पुढे नेण्यास उत्सुक दिसत नाही. या बाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारला एक पत्र देऊन, या योजनेस सहकार्य करण्याची विनंती केली, परंतु सध्याच्या सरकारने याबाबत पक्षपातीपणाची भूमिका घेतली आणि या मतदारसंघातील जनतेवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे .यामध्येही आपण लक्ष घालून हा प्रश्न निकाली निघण्यासाठी संबंधितांना आदेश देऊन ही योजना पूर्ण करावी अशी विनंती खासदार रणजितसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
नीरा देवघर प्रकल्पासाठी निधी उपलब्ध व्हावा
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यासाठी नीरा देवघर प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे, 1984 साली या धरणाची मंजुरी झाली व 2000 साली ते पूर्ण करण्यात आले, परंतु कालव्याची कामे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, जर ही कामे पुर्ण झाली असती तर प्रकल्पातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध झाले असते. माढा मतदारसंघातील तसेच सातारा मतदारसंघातील खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोल्यातील काही भाग १०० किलोमीटर अंतराच्या लोकांना पाणी पोहोचवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता परंतु 21 वर्षांमध्ये या योजनेस एकशे आठ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला व ही योजना राखडवण्यात आली. धरणातील पाणी राज्यकर्त्यांनी पाणी स्वतःच्या मतदारसंघाकडे वळवले . या योजनेस कमीत कमी १००० करोड ची आवश्यकता आहे. तरी आपण या योजनेस निधी उपलब्ध करून देणे बाबत आपल्या स्तरावर आदेश दयावेत अशी मागणीही खा. रणजितसिंह यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
नीरा देवघर योजनेचे 21 वर्षांमध्ये फक्त 65 किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. या मतदार संघाचे यापूर्वी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी नेतृत्व केले आहे परंतु हा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक सोडवला नाही, याउलट त्यांनी हे पाणी बारामती मतदारसंघाकडे वळवले होते परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात हे पाणी पुन्हा या दुष्काळी पट्ट्यातील या लोकांना देण्यात आले त्यामुळे दुष्काळी भागाला हे पाणी म्हणजे अमृतच आहे असं समजून यांचे स्वागत करण्यात आले .परंतु राज्यांमध्ये सत्ताबदल झाला आणि खा. शरद पवार यांनी पुन्हा हे पाणी बारामतीकडे वळवले आहे. नीरा-देवघर प्रकल्पास निधीची आवश्यकता आहे तो आपण पूर्ण करण्यासाठी केंद्रातून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व पर्यायी नीरा देवधर प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईन द्वारे सुद्धा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास माळशिरस,फलटण, सांगोला, पंढरपूर या भागातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल या दुष्काळी भागाचा दुष्काळी हा शब्द कायमस्वरूपी निघून जाईल यामुळे या मतदार संघातील जनता सदैव आपले ऋणी राहणार असल्याचे खा. रणजितसिंह यांनी सांगितले.
गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनासाठी निधी मिळावा
माण खटाव तालुक्यातील दुष्काळी भागासाठी गुरुवर्य काई. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कटापुर ) केंद्रशासनाच्या जल शक्ती मंत्रालया मार्फत राबवली जात आहे, या यामध्ये माण, खटाव तालुक्यातील 67 दुष्काळी गावाचा समावेश आहे. या प्रकल्पामध्ये 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पासाठी१०६१.३४ कोटी अंदाजे खर्च अपेक्षित आहे. त्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याबाबतचा निधीही प्राप्त झालेला आहे. 2020 अखेर या प्रकल्पावर ५८७.६८ इतका खर्च झालेला आहे. सद्य परिस्थितीत जिहे-कठापूर बॅरेज चे काम ९८/ टक्के पूर्ण झाले आहे. २०-२१ मध्ये ०.३५ टीएमसी पाणी साठा करण्याचे नियोजन आहे. २०२२-२३ मध्ये ही योजना पूर्ण कार्यान्वित करून 27500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली निर्माण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजने मधून १०० टक्के निधी प्राप्त व्हावा अशीही मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केली.
सर्व चर्चेअंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन ख. रणजितसिंह यांना दिले.


No comments