फलटणमध्ये वादळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा, पिकांना धोका
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० : फलटण शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
दुपारनंतर आकाश ढगाळ झाले होते. सायंकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः फळबागा, भाजीपाला व इतर उभ्या पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
एकीकडे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

No comments