Breaking News

फलटण मध्ये ओबीसी संघर्ष समितीचा रास्ता रोको ; ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध

Road blocked for OBC Sangharsh Samiti in Phaltan; OBCs oppose reservation for Maratha community

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ सप्टेंबर २०२५  - ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे या असंविधानिक मागनीसाठी उपोषणास बसलेल्या झुंडशाहीच्या दबावास बळी पडून, शासनाने ओबीसी आरक्षण विरोधी कोणतीही भूमिका घेऊ नये व ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण देऊ नये तसेच राज्यामध्ये असंविधानिकरीत्या ओबीसींच्या आरक्षणामध्ये  बोगस कुणबी नोंदणीच्या स्वरूपात जी घुसखोरी चालू आहे, लाखोंच्या संख्येने कोणत्याही आधाराविना कुणबी नोंदी दिल्या जात आहेत, त्या नोंदींची पडताळणी करून खोट्या नोंदी रद्द कराव्यात. या मागण्या करीत फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती तर्फे फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

    यामध्ये  लवकरात लवकर जाती निहाय जनगणना करावी तसेच ओबीसी नेत्यांवर वारंवार जे हल्ले होत आहेत, त्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. शासनाने ओबीसी वर होत असलेल्या अन्यायाचा विचार करून यावर तोडगा काढावा या मागण्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

    आज सकाळी ११ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे, ओबीसी संघर्ष समितीने रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल एक तास पुणे पंढरपूर महामार्ग आंदोलकांनी रोखला होता, त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, फलटण बसस्थानकात सर्व एसटी बसेस अडकून पडल्या मुळे वाहतूक खोळंबली होती.

    यावेळी फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीचे प्रमुख बापूराव शिंदे यांनी ओबीसीं प्रवर्गातून मधून मराठा समाजास आरक्षण देऊ नये, झुंडशाहीच्या दबावाला सरकारने बळी पडू नये आमचा आजही भारतीय संविधानावर विश्वास आहे, तरीही ओबीसी नेत्यांवर हल्ले होत आहेत, आमचा संयम आम्ही राखला असून या पुढे जशास तसे उत्तर ही दिले जाईल असे सांगितले.

    युवा कार्यकर्ते गिरीश बनकर यांनी मराठा व ओबीसी यांच्यात वाद निर्माण करनाऱ्या व  महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण बिघडवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या झुंडशाही वर जहाल शब्दात टीका केली.

    यावेळी विविध पक्षातील तसेच ओबीसींच्या सर्व जातीतील ओबीसी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते, आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ महामार्ग रोखून धरला गेला. यावेळी पोलिस व प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता.

No comments