न्यायालयात गैरहजर असल्यामुळे वॉरंट ; कुठल्याही बेकायदेशीर भानगडीत गुंतलेलो नाही - प्रल्हादराव साळुंखे पाटील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ जून २०२५ - दिल्ली न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यामध्ये सलग ३-४ वेळा गैरहजर असल्यामुळे न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंटची बजावणी करण्याकरिता पोलीस आले होते, त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेवू नये, आम्ही कुठल्याही बेकायदेशीर भानगडीत गुंतलेलो नाही असे आवाहन जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे -पाटील यांनी केले आहे.
ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्यासाठी दिल्ली पोलीस फलटणमध्ये दाखल झाल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्याशी दैनिक गंधवार्ताने संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली.
यावेळी बोलताना प्रल्हादराव साळुंखे पाटील म्हणाले की, दिल्ली येथील न्यायालयात खटला चालू असून, त्या खटल्यामध्ये मी तीन ते चार तारखांना गैरहजर असल्यामुळे, दिल्ली न्यायालयाने हजर राहण्यासंदर्भात वॉरंटची बजावणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेवू नये. आम्ही कुठल्याही बेकायदेशीर भानगडीत गुंतलेलो नाही.
No comments