वृक्ष लागवड व संवर्धन" ही एक सामाजिक चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे- दादासाहेब चोरमले
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा - दिवसें दिवस शहरांचा सर्वांगीण विकास होत असताना झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे संपूर्ण निसर्गाचा समतोल ढासळला असून या सर्व बाबींवर एकमेव उपाय म्हणजे "वृक्ष लागवड व संवर्धन" ही सामाजिक चळवळ तरुणांनी उभी केली पाहिजे असे प्रतिपादन सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी केले.
नारळी बाग फलटण येथील वरद सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.
यावेळी वरद सोसायटीचे अध्यक्ष मोहनराव खरात, उपाध्यक्ष संजय जाधव, सोसायटीच्या सचिव सौ. अरुणा संजय शेंडे, सौ. दडस मॅडम, दैनिक पुढारीचे पत्रकार पोपट मिंड, दैनिक स्थैर्य संपादक प्रसन्न रुद्रभटे, अमरसिंह पिसाळ, निखिल डोंबे सोसायटीचे सर्व सदस्य महिला- भगिनी इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी दादासाहेब चोरमले म्हणाले की, खरंतर संपूर्ण जगापुढे "जागतिक तापमान वाढ" ही एक मोठी गंभीर समस्या बनून राहिली आहे आणि प्रामुख्याने ही समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढणारी सिमेंटच्या जंगलांची संख्या, औद्योगीकरण, रस्ते, वाढता चंगळ वाद, व त्याच बरोबर मनुष्य प्राणी निसर्गाची लयलूट करीत आहे. आणि या संपूर्ण गोष्टीचा परिपाक म्हणून जागतिक तापमान वाढीची समस्या आता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. अनेक शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या जागतिक तापमान वाढीकडे संपूर्ण जगाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असून या समस्येवर योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. म्हणून प्रामुख्याने "वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन" ही चळवळ मोठ्या प्रमाणावर राबविणे गरजेचे असून प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी ५ वृक्ष लागवड करून त्या वृक्षाचे संवर्धन केले पाहिजे व यासाठी वेळ प्रसंगी सरकारने कठोर नियमावली तयार केली पाहिजे व त्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तींवर वेळप्रसंगी कठोर कारवाई करण्याची देखील मानसिकता दाखवली पाहिजे असेही शेवटी दादासाहेब चोरमले यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोसायटीचे अध्यक्ष मोहन खरात यांनी आपल्या प्रास्ताविकात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन याचे महत्व सर्वांना समजावून सांगितले.
वरद सोसायटीचे उपाध्यक्ष संजय जाधव, सोसायटीच्या सचिव शेंडे मॅडम व दडस मॅडम यांनी वृक्षाचे महत्व विशद करणारी भाषण केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी "वरद-प्लाजा" नारळी बागेच्या परिसरामध्ये जवळपास १५ ते २० फूट उंच असलेल्या झाडांची लागवड विविध मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली.
No comments