Breaking News

फलटणच्या भानुदास तावरे यांनी फुलवली माळरानावर निर्यातक्षम द्राक्ष शेती

Bhanudas Taware of Phaltan cultivates exportable grapes

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : दुष्काळी पट्ट्यातील तालुका मानल्या जाणाऱ्या फलटणमध्ये विंचुर्णी सारख्या माळरानावर निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पन्न कसे घ्यायचे याचे उत्तम उदाहरण म्हणून श्री. भानुदास जगन्नाथ तावरे यांचे 'तावरे फार्मस्' हे नाव आज समोर येत आहे.    

    श्री भानुदास तावरे यांचे मुळगाव चौधरवाडी, त्यांचे शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा, पण घरची फळबाग आणि त्यांची शेतीतील आवड यामुळे ते शेतीकडे खेचले गेले. फळबागांची शेती वाढवण्यासाठी त्यांनी विंचुर्णी येथे शेती विकत घेतली व डाळिंब या पिकापासून सुरुवात केली. परंतु 2013 साली बाग जुनी झाल्याने व द्राक्षाची वाढती मागणी बघता, त्यांनी डाळिंबाची शेती थांबवण्याचा निर्णय घेतला व तेथील जमिनीला व हवामानाला अनुसरून कमी पाण्यात सुद्धा द्राक्ष फळबाग तयार करण्याचे ठरवले.

    2013 पासून त्यांनी द्राक्ष पिकाची सुरुवात केली. बागेचे योग्यरीत्या व्यवस्थापन व काळजी घेतल्याने आज त्यांची बाग 20 एकर पर्यंत पसरलेली आहे. आज ते नानासाहेब पर्पल जम्बो या काळ्या द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. तसेच पाण्यासाठी ऑटोमायझेशन इरिगेशन सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर ते बागेसाठी करतात व त्याद्वारेच खते दिली जातात. अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून, ते आज एका हंगामात 20 एकर बागे मधून कमीत कमी दोनशे टन एवढा माल युरोप व इतर अनेक देशात निर्यात करत आहेत. 

    तरुणांना मार्गदर्शन करताना श्री भानुदास तावरे म्हणतात की,"शेतीला फक्त शेती म्हणून न बघता एक भरघोस उत्पन्नाचा व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. माती परीक्षण, हवामान बदल यांचा अभ्यास तसेच भांडवल गुंतवणुकीच्या धाडस आणि आत्मविश्वास यांच्या बळावर येणार्‍या पिढीने शेती हा व्यवसाय देखील करायलाच हवा!" 

ओंकार सुधाकर गायकवाड 
 चतुर्थ वर्ष बीएससी ऍग्री 
कृषी महाविद्यालय बारामती.

No comments