Breaking News

प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

 

        मुंबई, दि. 25 :- “आपल्या सदाबहार आवाजानं भारतीय सिनेसृष्टी समृद्ध करणारे ‘पद्मभूषण’ श्री. एस पी बालसुब्रमण्यम यांचं निधन हा माझ्यासारख्या कोट्यवधी चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. हिन्दीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायलेली चाळीस हजारांहून अधिक गाणी हा भारतीय संगीतातील मोठा ठेवा आहे. हा ठेवा संगीत रसिकांना मनमुराद आनंद तसेच त्यांची आठवण करुन देत राहील. भारतीय संगीत क्षेत्रातल्या या महान, दिग्गज कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, एस पी बालसुब्रमण्यम साहेबांच्या आवाजात जादू होती. या जादूमुळे त्यांना कोट्यवधी चाहते मिळाले. त्यांचे चाहते बहुभाषिक आहेत. चित्रपट सुपरहिट ठरण्यात त्यांच्या गायनाची प्रमुख भूमिका असायची. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीतातील ‘तेजस्वी तारा’ निखळला – सांस्कृतिक कार्य मंत्रीअमित देशमुख

        मुंबई दि. 25: हिंदीसह तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पार्श्वगायन करणारे ज्येष्ठ गायक श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम अर्थात एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाने संगीतातील एक तेजस्वी तारा निखळला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

        सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख शोकसंदेशात म्हणतात, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या एस. पी.बालसुब्रमण्यम यांनी भारतीय सिनेसृष्टीत आपल्या गायकीने मोठा श्रोतावर्ग निर्माण केला. त्यांच्या आवाजाची वेगळीच जादू प्रेक्षकांनी आणि रसिकांनी चित्रपटांमधून, वेगवेगळया लाईव्ह कॉन्सर्टमधून वेळोवेळी अनुभवली आहे. अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणाऱ्या या ज्येष्ठ गायकाच्या निधनाची बातमी चटका लावणारी आहे.

No comments