फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्रात 'मॉडेल' म्हणून पुढे आणणारे कार्यकुशल नेतृत्व : श्रीमंत रघुनाथराजे
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी विराजमान होण्याची संधी सलग तीनदा लाभली असून, श्रीमंत रघुनाथराजे यांनी मिळालेल्या संधीचे 'सोने' करून, फलटण बाजार समितीला महाराष्ट्रात नंबर वन ची कृषी उत्पन्न बाजार समिती केली आहे. याचीच पोहोचपावती म्हणून त्यांना महाराष्ट्र बाजार समिती सहकारी संघ पुणे यांचे विद्यमाने २०१६-२०१७ साठी दिला जाणारा पुरस्कार प्राप्त झाला आहे. बाजार समितीमध्ये श्रीमंत रघुनाथराजे यांनी अमुलाग्र बदल करुन, शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी जे विकासात्मक पाउले उचललेली आहेत व कार्य प्रत्यक्ष सुरु आहे, त्यामुळेच फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात नंबर वन ठरली तर आहेच; परंतु फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण महाराष्ट्रात 'मॉडेल स्किम' म्हणून गणली आहे. त्याच बरोबर सन २०२१ मध्ये मुंबई येथील वाय. बी.चव्हाण सेंट्रल हॉल येथे नवभारत या वृत्तपत्राची मराठी आवृत्ती नवराष्ट्र यांच्यावतीने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेल्या विविध उपक्रम व केलेल्या उत्कृष्ट कामकाजा बद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील बाजार समितीच्या कार्याचे कौतुक केले. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य शेतकरी यांच्यासाठी लाभदायक असून, बाजार समितीने राबवलीले प्रकल्प हे राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी दिशा दर्शक असल्याचे गौरवोद्गार राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले होते.
विविध पुरस्कारासह कृषी उत्पन्न बाजार समिती अ वर्गात
चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले असून, विविध पुरस्कारासह कृषी उत्पन्न बाजार समिती अ वर्गात आणण्याचे काम केले आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महाराष्ट्रात सर्वप्रथम हमालांसाठी कामगार नेते मानसिंगराव भगत श्रमजीवी पेन्शन योजना लागू केली, तसेच सात बारा धारक शेतकऱ्यांसाठी महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर शेतकरी अपघात विमा योजना चालू करुन संपूर्ण देशापुढे आदर्शवत काम केले आहे. बाजार समितीने सुरू केलेल्या योजना या चांगल्या असून, अपघाती विमा योजनेतील प्रिमियम देखील बाजार समिती स्वतः भरणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काढलेला विमा बंद पडणार नाही, हे दोन्ही निर्णय तालुक्याच्या वतीने स्वागतार्हच आहेत. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, विद्यमान चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये, बाजार समितीला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करुन नावारुपास तर आणले आहेच; परंतु बळीराजाला त्याच दिवशी पेमेंट करणारे आणि महाराष्ट्रात 'सुपर मार्केट योजना 'प्रथम' राबविण्यात यशस्वी झालेल्या श्रीमंत रघुनाथराजे यांनी फलटण बाजार समिती भविष्यात डिजीटल करण्याचा मनोदय नुकताच बोलून दाखविला आहे आणि त्यादृष्टीने बाजार समितीमध्ये कामकाजही सुरु झालेले आहे.
कृषिदेव पेट्रोलपंप - कार्डियाक अँबुलन्स सेवा सुरू
बाजार समितीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील प्रत्येक मुख्य रस्त्याला ११ पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत पेट्रोल व डिझेलच्या किमती या पेट्रोल पंपावर बाजारभावापेक्षा कमी असतील असे नियोजन श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने पेट्रोल पंपा साठी जागा आरक्षित करण्यात आल्या असून, ढवळपाटी ता. फलटण येथील पेट्रोल पंपचा शुभारंभ करण्यात आला आहे तर आंदरूड, बरड, सोमंथळी येथील पेट्रोल पंपाचे कामकाज प्रगतीपथावर असून, उर्वरित पेट्रोल पंप देखील लवकरच सुरू होती.
बाजार समितीच्या श्रीमंत रामराजे व्यथा निवारण कक्षाच्या उभारणीमुळे पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे, त्याच बरोबर श्रमजीवी लोकांसाठी कार्डियाक अँबुलन्सची मोफत सेवा बाजार समिती मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाजार समितीने, शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांसाठी एम बी ए कॉलेज फलटण येथे स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. तसेच पुढील काळात सिड बँक उभारणार, त्या माध्यमातून उत्तम बियाणे,
खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार असल्याचा मनोदय श्रीमंत रघुनाथराजे यांनी व्यक्त केला आहे.
डिजिटल बाजार समितीकडे वाटचाल
फलटण मार्केट यार्डवर भुसार व कांदा या शेतमालाचे उघड लिलाव पध्दतीने विक्री होत असते. त्यानंतर त्वरीत तोलाराकडून वजनमाप होउन बळीराजाला त्याच दिवशी त्वरीत पेमेंट दिले जाते आणि हेच या बाजार समितीचे वैशिष्ट्य आहे. बरड सब मार्केट यार्डवर कोल्हापूर पध्दतीप्रमाणे शेतमालाची आवक होताच प्रथम वजनमाप होते व लिलाव होताच पेमेंट अदा केले जाते. जनावरांचे खरेदी विक्रीचे बाबतीत मात्र खरेदीदार व विक्रीदार यांच्यात सौदे होतात व बाजार समिती तो व्यवहार नियम ६१ नुसार कायम करून देते. आजच्या मोबाईल आणि संगणकीय युगात उच्चशिक्षित असणाऱ्याला जर संगणकीय 'ज्ञान' नसेल तर तो 'अशिक्षित' गणला जातो. तसेच 'अंगठा बहाद्दर' असणाऱ्याला जर संगणकीय ज्ञान अवगत असेल तर तो 'सुशिक्षित' गणला जातो. वरील विचारसरणीला अनुसरुनच जणू काय, श्रीमंत रघुनाथराजे हे कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्णपणे संगणकीय करुन प्रत्येक ठिकाणी सीसीटिव्ही बसवून, बळीराजाला पारंपारीक पद्धतीतून आधूनिक पद्धतीकडे म्हणजेच 'डिजीटल ' बाजार समितीकडे घेऊन निघाले आहेत. संगणकीय बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाचा 'लिलाव' डिजीटल होणार असून शेतकऱ्यांना मोठ्या स्क्रीनवर बाजार भाव पहाण्याची सुविधाही पुरविली जाणार आहे, भविष्यात बळीराजाने आणलेल्या सर्व शेतीमालाची संगणकीकृत सुविधानुसार गेटवरच नोंद होणार असून शेतकऱ्यांना शेतीमालाचे 'अपडेट', शेतीमालाचे दर वगैरे संबंधीची माहिती रोजच्या रोज त्यांच्या मोबाईलवर व्हाटॲप्सवर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी विविध योजना - उपक्रम
शेतकऱ्यांच्या सुखसोईसाठी त्यांना एटीएम सुविधा पुरविली जाणार असून अत्याधुनिक कॅन्टीनची सोयही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. घरातून निघाल्यानंतर बाजार समितीमध्ये येईपर्यंत आणि आपला शेतीमाल बाजार समितीमध्ये ठेवल्यानंतर शेतकऱ्यांच्या विसाव्यासाठी विश्रांतीसाठी विश्रामगृह सुद्धा उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
भविष्यकाळात शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी कटीबध्द राहणार असून, यासाठी आपण कृष्णा हॉस्पिटलशी टायप केला असून पुढील काळात "व्यथा व समस्या निवारण" केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्याने खाजगी सावकारी मोडुन काढणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कमी भावात कपडे उपलब्ध करण्यासाठी "किसान" नावाचा ब्रँण्ड आणणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या मुलांच्या - मुलींच्या लग्नासाठी सोने घ्यावे लागते यासाठी “कृषी उत्पन्न बाजार समितीच्या” आवारात पुण्यातील सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी नितीन अष्टेकर ज्वेलर्स यांचे दुकान आणणार आहे. यामुळे याठिकाणी शेतकऱ्यांची दागिने करण्यासाठी लागणारी करणावळ व घडणावळ वाचणार आहे. भविष्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व फायदेशीर उपक्रम राबवून ही बाजार समिती शेतकऱ्यांना आपली संस्था वाटावी असे काम करणार असल्याचा मनोदय श्रीमंत रघुनाथराजे यांनी व्यक्त केला आहे.
कोव्हीड महामारी च्या काळामध्ये हॉस्पिटल ची कमतरता व शेतकऱ्यांना, नागरिकांना हॉस्पिटल मध्ये मिळणाऱ्या असुविधा पाहून, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने, आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी ढवळपाटी (जलनायक रामराजेनगर) ता. फलटण येथे १०० बेडचे सुसज्ज कोरोना केअर सेंटर सुरू करून नागरिकांना व शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिली, तसेच कोव्हीड महामारी काळात तर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतःची काळजी न करता नागरिकांच्यात जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यांना मदतीचा हात दिला आहे. लॉकडाऊन मध्येही शेतकरी व नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप चालू होते.
संस्था कशी चालवावी आणि ती उर्जितावस्थेत कशी आणावी, ह्याचे अचूक ज्ञान असणाऱ्या श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती - फलटण नगर परिषद असो. अथवा शैक्षणिक संस्था असो अथवा ट्रस्ट असो, ह्या प्रत्येक संस्थांमध्ये आपला आगळा-वेगळा ठसा उमटवून त्या संस्था लोकाभिमूख करण्याचे कौशल्य श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यात जसे आहे. तसेच कौशल्य तरुणांचे संघटन करुन, तरुणांमध्ये आशेचे स्थान निर्माण करण्याचे धाडसही श्रीमंत रघुनाथराजे यांच्यामध्ये आहे आणि त्याची मुर्तिमंत उदाहरणे म्हणजे फलटण नगर परिषद व फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्था आणि आजचे तरुण, जे त्यांच्या पाठिशी उभे आहेत हेच होय, यामध्ये दुमत नाही.
संस्थानकालिन ऐतिहासीक अशा मनमोहन राजवाड्याचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी असे बेमालूम रिन्युअशन केलेले आहे की, पहाणाऱ्याला आजही तेथे जुने काय आणि नवे काय आहे कळत नाही. म्हणून तर आज ह्या राजवाडा परिसरामध्ये अनेक नटनट्यांचे आणि धारावाहिक, सिरिअलचे शूटिंग सतत सुरु असते. त्यामुळेच फलटणकरांना बॉलीवुडचे सानिध्य लाभत आहे.
नगराध्यक्ष पदाची कारकीर्द म्हणजे माईलस्टोन
फलटण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाची कारकिर्द श्रीमंत रघुनाथराजे यांनी आपल्या कल्पकदृष्टीकोणातून इतकी लोकाभिमुख केली अर्थात सदरची त्यांची कारकिर्द 'माईल स्टोन' (मैलाचा दगड ) ठरावी अशीच आहे.
एक इतिहास निर्माण करुन ऐतिहासिक 'वसा' जगासमोर ठेवणाऱ्या, ऐतिहासीक अशा नाईक निंबाळकर घराण्यात जन्माला आलेल्या श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना फलटणचे प्रथम नागरीक होण्याचा बहुमानही दोन वेळा लाभलेला आहे. आलेल्या संधीचे 'सोने' करण्याचा मूलमंत्र त्यांना आपले ज्येष्ठ बंधू आणि फलटणचे भाग्यविधाते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कडून मिळालेला असल्यामुळे त्यांनी फलटण नगर परिषद येथे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक अत्याधुनिक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. आणि मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु ठेवलेला आहे. फलटण नगरपरिषदेला 'प्रथम स्थाने जन: ' हे ब्रिदवाक्य देणारे आणि फलटण नगर परिषदेला नूतन वास्तूचा आराखडा दिला. शहरात विविध विकासकामे केली.
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ज्यावेळी नगराध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी भरपुर विकासकामे केली. विकासकामे करवुन घेत असताना त्यांच्या कारकिर्दिमध्ये भ्रष्टाचार दिसत नव्हता किंबहुना जे भ्रष्टाचार करीत होते, त्यांना श्रीमंत रघुनाथराजे कडक शासन करीत असत. भ्रष्टाचार 'राज'च्या विरोधात फनपची कामे केली असल्यामुळेच, त्यांनी केलेल्या सर्व विकासकामांचा दर्जा उत्तम आहे. कमी व हलक्या प्रतींची कामे झाली नाहीत. अशा प्रतिमेच्या नेत्याचा, श्रीमंत रघुनाथराजे यांचा १४ जून २०२५ रोजी ६२ वा वाढदिवस संपन्न होत असताना सर्वांनाच आनंद होत आहे. आज त्यांच्या साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आमच्याही हार्दिक शुभेच्छा !
- ॲड. रोहित अहिवळे
No comments