Breaking News

तासवडे टोलनाक्यानजीक खासगी बसला अचानक आग , बस जळून खाक,बसमधील ५५ प्रवासी सुखरुप

A private bus caught fire near Taswade toll booth

    सातारा दि. 7 : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खासगी बसला अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यानजीक पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील बसमधून एकूण ५५ प्रवाशी प्रवास करत होते.दरम्यान, तासवडे टोल  व्यवस्थापन, महामार्ग पेट्रोलिंग कर्मचारी व तळबीड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत केलेल्या मदतकार्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. बसमधील ५५ प्रवासी सुखरुप आहेत. दरम्यान, या घटनेत बसचे अंदाजे २० लाख रुपयांचे, तर प्रवाशांचे प्रवासी बॅगेतील साहित्य जळून मोठे नुकसान झाले.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, डाॅल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस (क्रमांक- एम.एच. ०३-सी.पी. ४५००) ही काल रात्री प्रवासी घेऊन मिरजहून मुंबईकडे निघाली होती. दरम्यान, ही बस पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबईकडे जात असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही बस कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागल्याची माहिती पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बस चालकासह इतर वाहनधारकांनी बस चालकासह प्रवासी व तासवडे टोल व्यवस्थापनाला दिली.अल्पावधीतच बसने आगीचे रौद्ररूप धारण केल्याचे सर्वांना दिसत होते. दरम्यान, त्यावेळी तासवडे टोलचे शिफ्ट इन्चार्ज नवनाथ साळुंखे यांनी आपल्या टोल कर्मचारी सहकाऱ्यांच्या व महामार्ग पेट्रोलिंग विभागाचे कर्मचारी फैय्याज शेख, हिंदुराव चव्हाण, सचिन जाधव, योगेश पाटोळे, ऋषिकेश साळुंखे, प्रदीप काळे व तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून गाडीतील प्रवाशांना खाली उतरले.

    त्यानंतर तात्काळ मदतकार्यासाठी नजीकच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर केवळ अर्ध्या तासातच कराड नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर पोहचली. अग्निशामक दलाची गाडी वेळेत आल्यानंतर सुमारे तासभर सुरु असलेली आग काही वेळातच आटोक्यात आली.दरम्यान, आग लागलेल्या बसचे सुमारे वीस लाख रुपयांचे व प्रवाशांच्या प्रवासी बॅगेतील साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याचे टोल कर्मचाऱ्यांनी सांगितले. टोल व्यवस्थापनासह तळबीड पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ केलेल्या मदतकार्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. बसमधील प्रवाशांनी टोल व्यवस्थापनाचे आभार मानले.आगीची घटना घडलेल्या घटनेपासून तासवडे टोलनाका केवळ काही सेकंदांच्या अंतरावर होता. त्यावेळी टोलवर वाहनांची नेहमीप्रमाणे गर्दीही होती. टोल कर्मचारी हे आपल्या कामात व्यस्त होते. दरम्यान, घटनेची माहिती समजताच एकच गोंधळ उडाला. बसची डिझेल टाकीही फूलच होती.दरम्यान, आगीचे रौद्ररूप धारण केलेल्या बसमधील प्रवाशांचा गोंधळ सुरु होता. त्यातच आग डिझेल टाकीपर्यंत येऊन पोहचली होती. सर्वांच्यात भीतीचे वातावरण होते. मात्र, नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडी वेळेत पोहचली आणि कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा घटनास्थळावर होती.

No comments