Breaking News

बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना - उपक्रम राबविणार - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

Various schemes and activities will be implemented for the farmers through the market committee -  Raghunathraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८  -  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले असून, विविध पुरस्कारासह कृषी उत्पन्न बाजार समिती अ वर्गात आणण्याचे काम आपण केले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना भविष्यात बाजार समितीच्या माध्यमातून, आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी, खाजगी सावकारी मोडुन काढण्यासाठी उपाययोजना करून, शेतकऱ्यांसाठी मॉल्स, दुकाने अशा सुविधा मार्केट यार्ड येथे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    गोखळी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत श्रीमंत रघुनाथराजे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राजनभाऊ फराटे, महादेव माने, तानाजीराव गावडे, सरपंच बापूराव गावडे,  मनोजतात्या गावडे, बजरंग गावडे, डॉ. शिवाजीराव गावडे, भिमदेव बुरुंगले, भगवान होळकर, पै. बजरंग खटके, मोहनराव निंबाळकर, श्रीराम बाजार चे माजी चेअरमन महादेव पवार, हनुमंतवाडीचे सरपंच विजयसिंह जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.

     श्रीमंत रघुनाथराजे पुढे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. हा विश्वास निर्माण करण्यासाठी भविष्यकाळात शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी कटीबध्द राहणार असून यासाठी आपण कृष्णा हॉस्पिटलशी टायप केला असून, पुढील काळात "व्यथा व समस्या निवारण" केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्याने खाजगी सावकारी मोडुन काढणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कमी भावात कपडे उपलब्ध करण्यासाठी "किसान" नावाचा ब्रँण्ड आणणार असल्याचे सांगून पुढे श्रीमंत रघुनाथराजे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना आपल्या मुलांच्या - मुलींच्या लग्नासाठी सोने घ्यावे लागते यासाठी “कृषी उत्पन्न बाजार समितीच्या” आवारात पुण्यातील सुप्रसिद्ध सोन्याचे व्यापारी नितीन अष्टेकर ज्वेलर्स यांचे दुकान आणणार आहे. यामुळे याठिकाणी शेतकऱ्यांची दागिने करण्यासाठी लागणारी करणावळ व घडणावळ वाचणार असल्याचे सांगून, श्रीमंत रघुनाथराजे यांनी भविष्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व फायदेशीर उपक्रम राबवून ही बाजार समिती शेतकऱ्यांना आपली संस्था वाटावी असे काम करणार असल्याचे श्रीमंत रघुनाथराजे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

No comments