Breaking News

भूसंपादन प्रक्रिया थांबवा : मोर्चाद्वारे शेतकर्‍यांची मागणी

 प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना अड. नरसिंह निकम, बजरंग गावडे, खंडेराव सरक, अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर वगैरे
Stop Land Acquisition Process: Farmers' Demand Through Morcha
      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ :   अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी निंभोरे, ढवळेवाडी, मिरगाव गावातील सुमारे ३०० एकर क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया बेकायदेशीरपणे सुरु करण्यात आली असून, ती त्वरित थांबवावी अन्यथा धरणे, मोर्चा, उपोषण, चक्री उपोषण, आमरण उपोषण, मतदानावर बहिष्कार वगैरे सनदशीर मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
    फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते प्रांताधिकारी कार्यालय या मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चा द्वारे या गावातील सुमारे १००/१५० स्त्री - पुरुष खातेदारांनी प्रांताधिकारी डॉ. जगताप यांना निवेदन दिले. त्यावेळी निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप जिल्हा उपाध्यक्ष जुयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अध्यात्म आघाडीचे अशोकराव जाधव, युवा मोर्चाचे सुशांत निंबाळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, वंचित बहुजन आघाडीचे तुकाराम गायकवाड, शिवसेना उप जिल्हा प्रमुख विराज खराडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप झणझणे, शहर प्रमुख विजय मायणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, शरद सोनवणे, कृष्णात नेवसे, किशोर सोनवणे, राजेंद्र नागटिळे, अशोक भोसले वगैरे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
    या ३ गावातील क्षेत्र अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहित  करावे अशी मागणी या गावातील लोक किंवा शेतकऱ्यांनी केली नाही, तिन्ही गावातील ग्रामपंचायतींनी अशी कोणतीही मागणी ठरावाद्वारे केलेली नाही उलट या ग्रामपंचायतींनी अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी आमच्या गावातील जमिनी घेऊ नयेत किंबहुना आम्हाला औद्योगिक क्षेत्र नको असे ठराव या ग्रामपंचायतींनी केले असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
 शासन अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी भू - संपादन प्रक्रिया राबवीत असलेल्या जमिनी विहीर बागायत असून त्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, कांदा, ऊस ही पिके घेतली जातात आणि काही क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. त्याचप्रमाणे या शेतीला जोड धंदा म्हणून सुरु करण्यात आलेल्या दुग्ध व्यवसाया- साठी घेतलेल्या गाई, म्हशी व अन्य जनावरे याच क्षेत्रातील गवत व मका कडवळावर सांभाळली जात आहेत, असे असताना आमचे हे क्षेत्र काढून घेतल्यास उत्पन्नाचे अन्य साधन नसल्याने आमची कुटुंबे उघड्यावर पडणार असल्याने सदर जमिनीच्या भसंपादनास आमचा विरोध असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. 
    नीरा - देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी आमच्या जमिनी यापूर्वी घेण्यात आल्या त्यावेळी आम्ही विरोध केला नाही कारण उर्वरित क्षेत्राला पा पाणी मिळणार होते, ते धरणात साठवून १४/१५ वर्षे झाली मात्र कालव्या अभावी ते लाभ क्षेत्रात पोहोचले नाही, आता कालवे होणार असून पाणी या क्षेत्रात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली असताना आमचे क्षेत्रच काढून घेतले जाणार असेल तर पाणी येईल त्यावेळी भूमिहीन म्हणून त्या पाण्याकडे केवळ पाहण्याशिवाय आम्हाला त्याचा लाभ घेता येणार नसल्याने आता इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पाणी येत आहे, त्याचा लाभ घेऊन आमच्या कुटुंबांना सुधारण्याची संधी द्या, आमच्या जमिनींचे भू संपादन त्वरित थांबवा एवढीच आमची मागणी असल्याचे आंदोलन कर्त्यानी ठणकावून सांगितले.
           निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ॲड. नरसिंह निकम, बजरंग गावडे, तुकाराम गायकवाड, खंडेराव सरक वगैरेंनी औद्योगिक वसाहतीमधील कमिन्स इंडिया कंपनीचा कोणताही लाभ फलटण करांना मिळाला नाही, आता अतिरिक्त औद्योगिक वसाहतीचाही लाभ मिळण्याची खात्री नसल्याने सदर भू संपादन प्रक्रिया त्वरित रद्द करण्याची मागणी करतानाच नाईकबोमवाडी येथे नवीन औद्योगिक वसाहत शासनाने मंजूर केली असून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर तेथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आणून दिले.
      क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते अधिकार गृहा पर्यंत मोर्चा शांततेने पोहोचला, सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी मोर्चा गेट बाहेर अडविल्यानंतर तेथेच सर्व नेते, पदाधिकारी व आंदोलन कर्त्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी बाहेर येऊन निवेदन स्विकारले, ते वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
   दरम्यान मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, जिल्हाधिकारी वगैरेंना भेटून निवेदन देवून भू संपादन प्रक्रिया त्वरित थांबविण्याची मागणी करणार असल्याचे अड. नरसिंह निकम यांनी सांगितले. 

No comments