Breaking News

रस्त्यांच्या कामांसाठी निधी द्यावा ; खा. रणजितसिंह यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे मागणी

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी चर्चा करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
Funding for road works; MP Ranjitsingh's demand to Union Minister Nitin Gadkari

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : माढा लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामांसाठी निधी देण्यात यावा अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय राष्ट्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली आहे. 

        केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजपच्या सर्व खासदारांची बैठक संपन्न झाली, त्यावेळी गडकरी यांच्याशी चर्चा करुन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुणे-फलटण-खटाव-माण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग पूर्ण केल्यानंतर या भागाचा आर्थिक विकास होणार आहे तसेच या महामार्गावर नाईकबोमवाडी येथे औद्योगिक वसाहत पूर्ण झाल्यास फलटण ते इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकसित होईल, करमाळा ते टेंभुर्णी रस्ता लवकरच चौपदरीकरण करावा तसेच हा रस्ता टेंभुर्णी गावासह चौकापर्यंत गटारी सह पूर्ण करण्यात यावा, करमाळा-सोलापूर येथे ओवर ब्रिज मंजूर करण्यात यावा, नवीन पुणे-सोलापूर सहापदरी हायवे मंजूर करण्यात यावा , माण तालुक्यातील माणगंगा नदीवर अतिरिक्त ओवर ब्रिज मंजूर व्हावा, फलटण-उपळवे एम डी आर ६७ यासाठी तीस कोटी निधी उपलब्ध व्हावा, संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावर मोठी गावे असलेल्या  गावात स्वागत कमानी उभारून त्यावर ऐतिहासिक परंपरांचा उल्लेख करावा, सोलापूर औद्योगिक शहर असल्याने शहरात सर्वाधिक औषध  उत्पादन होते, त्यामुळे ते औद्योगिक कॉरिडोर म्हणून घोषित करावे, टेंभुर्णी ते अकलूज काँक्रिटीकरण लवकरात लवकर करावे, महाराष्ट्रातील भक्तांचे प्रसिद्ध देवस्थान तुळजापूर व भाविकांचे श्रद्धास्थान शिखर शिंगणापूर यांना जोडणारा रस्ता तुळजापूर, बार्शी, कुर्डूवाडी, टेंभुर्णी मार्गे शिंगणापूर असा करण्यात यावा, शेरेचीवाडी, सालपे, सुरवडी येथे ओव्हरब्रिज मंजूर करणे बाबत, फलटण येथे विमानतळ असून विमानतळाची धावपट्टी लहान असल्याकारणाने विमान उतरवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे हवाई पट्टीची तरतूद करण्यात यावी आदी कामांसाठी निधीची मागणी केली. 

        विकास कामांबाबत आपला नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिला आहे. आपल्या मागण्या व प्रश्न मार्गी लावले जातील. त्यानुसार संंबंधित विभागास तशा सुचना दिल्या आहेत. सर्व प्रश्न लवकरच मार्गी लागतील असे मंत्री गडकरी यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यावेळी सांगितले.

No comments