छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा ; कर्नाटक मुख्यमंत्र्याना महाराष्ट्रात आजीवन बंदी घाला
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकणाऱ्या लोकांवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करताना मराठा क्रांती मोर्चा फलटण चे समन्वयक,व इतर सामाजिक कार्यकर्ते |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कर्नाटकात अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करून एक प्रकारे देशद्रोह केला असून, अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्या तसेच अशा घटना घडतात असे चीड निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात आजीवन बंदी घालावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटण व शिवप्रेमींनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान त्याचे निवेदन आज फलटण चे तहसीलदार यांना देण्यात आले.
बेंगरुळू कर्नाटक येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,संपुर्ण जगाला आदर्श असणारे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना करण्यात आली, या घटनेने सकल मराठा समाजाचा भावना दुखावल्या असून हे कृत्य करणाऱ्या लोकांना पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा व केंद्रीय गृह विभागाने शोधून कर्नाटक पोलिसांना आदेश देऊन ताब्यात घ्यावे,व त्यांच्यावर देश द्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशी आज मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी मागणी केली.
कर्नाटक सरकार व आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकणाऱ्या लोकांचा व अशा वाईट कृत्य करणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करीत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री अशी गरळ ओकत असून त्यांना महाराष्ट्रात आजीवन बंदी घालण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान एवढी मोठी घटना घडूनही त्या देशद्रोही लोकांना चेतना मिळेल असे वक्तव्य तेथील मुख्यमंत्र्यांनी केल्याने त्यांच्यावर पंतप्रधान,राज्यपाल व केंद्रीय गृहमंत्री यांनी कारवाई करावी,अशीही मागणी मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी केली,दरम्यान या नीच कृत्याचा निषेध करीत, संबंधित लोकांवर केंद्रीय गृहमंत्री यांनी तसेच गृह विभागाने ताबडतोब कायदेशीर कारवाई करण्यात यावी,तसेच या पुढे अशी घटना घडल्यास आम्ही मराठा बांधव त्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवू असा इशारा ही दिला आहे.
दरम्यान या घटनेने मराठा समाज व तमाम शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्या ने कर्नाटक सरकार मधील सत्ताधारी मंत्री,आमदार व कन्नडी लोकांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चा फलटण व सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments