अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वात जास्त फलटणचे नुकसान ; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली फलटणच्या पूरग्रस्त भागाची पाहणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० मे २०२५ - सातारा जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात सात तालुक्यात अतिवृष्टी झाली, सातारा जिल्ह्याचा मे महिन्याच्या पाऊसकाळ पहिला तर सरासरीच्या आठपट पाऊस अधिक झाला आहे, या मध्ये फलटणचा विचार केला तर एका वर्षात पडणाऱ्या पावसाच्या ९५ टक्के पाऊस तीन दिवसात झाला आहे, फलटणच्या सर्वच मंडला मध्ये अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली, मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे या काळात पूरग्रस्त भागाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू असून, सर्व शासकीय यंत्रणा फिल्डवर आहेत, अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान फलटण तालुक्याचे झाले असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
मा. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आज मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, जिल्हापोलीस प्रमुख तुषार दोशी, जिल्हापरिषदेच्या कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ . अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल मोरे, जिल्हा बॕकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, माजी नगराध्यक्ष दिलिपसिंह भोसले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले व इतर सर्व मान्यवरांच्या समवेत आणि अधिकारी वर्गासोबत फलटण शहरातील पूर बाधित क्षेत्र भेट दिली व हरीबुवा मंदिराच्या जवळील पुलाची आणि बाणगंगा नदीच्या काठावर असलेल्या शनिनगर येथील पूरग्रस्त घरांची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील माध्यमांशी बोलत होते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून सर्व पंचनामे झाल्यानंतर ताबडतोब शासकीय मदत देण्याची आश्वासन अधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
No comments